मुंबई : हुंड्यासाठी महिलेचा छळ केल्याप्रकरणी दिंडोशी पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. श्रुंखला जैन या महिलेने या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. लग्नात पावणेपाच कोटी रुपये किमतीचे दागिने दिले होते. मात्र सतत हुंड्यासाठी शारिरीक आणि मानसिक छळ केला जात असल्याचा आरोप तिने तक्रारीत केला आहे.

याप्रकरणी श्रृंखला जैन (३५) यांनी दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गोवर्धन याच्यासोबत त्यांचा २०२१ मध्ये विवाह झाला होता. या लग्नाचा संपूर्ण खर्च श्रृंखलाच्या वडिलांनी केला होता. लग्नाच्या वेळी श्रृंखलाच्या वडिलांनी पावणेपाच कोटी रुपयांचे दागिने दिले होते. लग्नानंतर त्या महालक्ष्मी येथे राहण्यासाठी गेल्या. मात्र पती, तसेच सासू, सासरे हुंड्यासाठी सतत छळ करीत होते. प्रत्येक सणाच्या वेळी तिच्या आई- वडिलांना किंमती भेटवस्तू पाठविण्यास सांगितले जात होते.

गर्भवती असताना देखील पुरेसे अन्न न देता मानसिक छळ करण्यात आला, असा आरोप त्यांनी केला आहे. सासरच्या मंडळींना मुलाची अपेक्षा होती. मात्र मुलीचा जन्म झाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त करीत आणखी वाईट वागणूक दिली, असाही त्यांनी आरोप केला आहे. फिर्यादी श्रुंखला यांना डेबीट आणि क्रेडीट कार्ड वापरण्यास मनाई करण्यात आली होती. लग्नात मिळालेले पावणेपाच कोटी रुपये किमतीचे स्त्रीधन त्यांच्या सासूने आपल्या ताब्यात ठेवले आहे, असेही या तक्रारीत म्हटले आहे.

या तक्रारीवरून दिंडोशी पोलिसांनी पोलिसांनी तिचे पती, सासू आणि सासऱ्यांविरोधात हुंडाबळी अधिनियम १९६१ च्या कलम ४, तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम ११५ (२), ३ (५), ३१६ (२), ३५१(२) आणि ८५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हुंडाबळीच्या वाढत्या घटना

पुण्यातील वैष्णवी हगवणेच्या मृत्युनंतर कौटुंबिक हिंसाचार व हुंड्याच्या प्रथेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबईतही दिवसाला एक ते दोन महिला हुंड्यासह कौटुंबिक हिंसाचाराच्या बळी ठरत आहेत. मुंबई शहरात २०२४ मध्ये हुंड्यासाठी छळ केल्याप्रकरणी ४३८ गुन्हे दाखल करण्यात आले होते. चालू वर्षात जानेवारी – एप्रिल या ४ महिन्यांत १६३ गुन्हे दाखल झाले आहेत. लग्नानंतर हुंड्यासाठी छळ होत असल्याने २०२४ मध्ये ११ महिलांनी आत्महत्या केली होती, तर या वर्षातील (जानेवारी ते एप्रिल ) या कालावधीत एकूण ५ महिलांनी आत्महत्या केली आहे. मागील वर्षात ८ विवाहित महिलांचा संशयास्पद मृत्यू झाला होता.