मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घरगुती ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्नही मिळावे, यासाठी सुरू केलेल्या ‘पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेच्या’ अंमलबजावणीत महावितरणने यशस्वी कामगिरी केली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला या योजनेअंतर्गत घरगुती ग्राहकांच्या छतावरील सौर ऊर्जानिर्मिती क्षमतेने एक हजार मेगावॅटचा टप्पा ओलांडला आहे, असे महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी सांगितले.

या योजनेचा घरगुती ग्राहकांना थेट लाभ असल्याने तिच्या अंमलबजावणीवर भर देण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. केंद्र सरकारने फेब्रुवारी २०२४ मध्ये सुरू केलेल्या या योजनेअंतर्गत गेल्या दीड वर्षात छतावर सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविणाऱ्या राज्यातील ग्राहकांची संख्या अडीच लाखापेक्षा अधिक झाली असून त्यांची एकत्रित वीजनिर्मिती क्षमता एक हजार मेगावॅट झाली आहे. या ग्राहकांना केंद्र सरकारकडून १८७० कोटी रुपये अनुदान मंजूर झाले आहे.

या योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र हे देशात आघाडीचे राज्य ठरले आहे. छतावर सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प बसविण्याच्या पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेच्या अंमलबजावणीत राज्यात नागपूर जिल्ह्याने ४०,१५२ लाभार्थी ग्राहक आणि १५७ मेगावॅट क्षमतेसह प्रथम क्रमांक मिळविला आहे. नागपूर जिल्ह्यापाठोपाठ पुणे (१९,१९५ ग्राहक व ८९ मेगावॅट क्षमता), जळगाव (१८,८९२ ग्राहक व ७० मेगावॅट क्षमता), अमरावती (१५,२४५ ग्राहक व ६३ मेगावॅट क्षमता), छत्रपती संभाजीनगर (१६,६६४ ग्राहक, ५९ मेगावॅट क्षमता) व नाशिक (१५,४६८ ग्राहक, ५५ मेगावॅट क्षमता) या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो.