मुंबई : उत्तर मुंबई राहणाऱ्या ४५ वर्षांच्या महिलेची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली दिल्लीतील प्रसिद्ध यूट्यूबरला मुंबई पोलिसांनी अटक केली. पियुष कटियाल असे या आरोपीचे नाव असून समाज माध्यमांवर त्याचे पाच लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. आरोपीने वैद्यकीय कारणासाठी महिलेकडून पैसे घेतले होते. त्यानंतर त्याने तिला धमकावण्यास सुरुवात केली. याप्रकरणी आरोपीच पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दिल्लीतील यूट्यूबवर पियुष समाज माध्यमांवर प्रॅन्क व्हिडीओ बनवतो. त्यामुळे समाज माध्यमांवर त्याचे पाच लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. पियुषचे व्हिडिओ पाहून ४ ते ५ महिन्यापूर्वी ४५ वर्षीय महिलेने त्याचे अकाऊंट फाॅलो केले होते. व्हिडिओवरील कमेंट पाहून पियुषने तिच्याशी संपर्क साधला. कालांतराने दोघांनी एकमेकांना आपले मोबाइल क्रमांक दिले. त्यांच्यात चांगली मैत्री झाली.
पियुषने काही दिवसांपूर्वी अचानक वैद्यकीय कारणासाठी तात्काळ रकमेची आवश्यकता असल्याचे तिला सांगितले. महिलेने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याला मदत केली, मात्र त्यानंतर विविध कारणे देऊन पियुष महिलकडे पैसे मागू लागला. सुरुवातीला महिलेने पैसे दिले. पण त्यानंतर तिने पैसे नकार दिला. पैसे न दिल्यास स्वत:च्या मोबाइलवरील चॅटिंगचे स्क्रीनशॉर्ट समाज माध्यमांवर वायरल करण्याची धमकी आरोपीने महिलेला दिली. तसेच आपली पोलिसांकडे ओळख असून बदनामी करण्याची धमकी त्याने महिलेला दिली.
या प्रकारामुळे पीडित महिला घाबरली होती. आरोपीने तिच्याकडून विविध कारणासाठी एकूण १९ लाख उकळले. पण त्यानंतरही त्याची पैशांची मागणी सुरूच होती. पियुषची पैशांची मागणी थांबतच नसल्याचे पाहून अखेर महिलेने उत्तर सायबर पोलिसांकडे धाव घेतली. महिलेने दिलेल्या तक्रारीवरून उत्तर सायबर पोलिसांनी फसवणूक व माहिती तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवून तपासाला सुरूवात करून पियुषला दिल्लीतून अटक केली.
पियुषला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. याप्रकरणी सायबर पोलीस अधिक तपास करीत आहेत. अनोळखी व्यक्तींसोबत समाज माध्यमांवर ओळख करून त्यांना पैसे देऊ नये, असे आवाहन सायबर पोलिसांकडून वारंवार करण्यात येत आहे. त्यानंतही नागरिक अनोळखी व्यक्तीला पैसे देऊन बळी पडत आहेत. नागरिकांच्या सतर्कतेमुळे असे गुन्हे रोखणे सहज शक्य आहे. तसेच अशा प्रकारे फसवणूक झाल्यास त्याबाबत तात्काळ स्थानिक पोलिसांकडे तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.