लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : म्हाडा प्राधिकरणाच्या लोकशाही दिनाच्या धर्तीवर म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाने जनता दरबार आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. दुरुस्ती मंडळाचा पहिला जनता दरबार मंगळवार, २२ एप्रिल रोजी म्हाडा भवनात भरणार आहे. यावेळी पुनर्विकास, बृहतसूची, संक्रमण शिबीर, पात्रता निश्चिती यासह अन्य काही विषयांशी संबंधित तक्रारी, समस्या मांडून त्यांचे निराकरण करून घेण्याची संधी उपकरप्राप्त इमारतीतील भाडेकरू आणि संक्रमण शिबिरार्थींनी उपलब्ध होणार आहे.
मुख्य अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबार
म्हाडा लाभर्थी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या म्हाडाशी संबंधित अनेक तक्रारी, समस्या असतात. या तक्रारी सोडविण्यासाठी त्यांना म्हाडाच्या कार्यालयात फेऱ्या माराव्या लागतात. अनेकदा अधिकाऱ्यांकडून या समस्यांचे योग्य निराकरण होत नाही. या पार्श्वभूमीवर नागरिक, म्हाडा लाभार्थी, संक्रमण शिबिरार्थी, उपकरप्राप्त इमारतीतील भाडेकरूंच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी म्हाडा प्राधिकरणातर्फे मागील काही महिन्यांपासून म्हाडा उपाध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिन आयोजित करण्यात येत आहे.
लोकशाही दिनामुळे अनेकांच्या तक्रारीचे योग्य निराकरण होत असून या लोकशाही दिनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही बाब लक्षात घेऊन म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी मंडळस्तरावर जनता दरबाराचे आयोजन करण्याचे निर्देश सर्व विभागीय मंडळांना दिले होते. त्यानुसार दुरुस्ती मंडळाचा पहिला जनता दरबार मंगळवार, २२ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे. वांद्रे येथील म्हाडा भवनातील तिसऱ्या मजल्यावरील भारतरत्न गुलजारीलाल नंदा सभागृहात दुपारी १२ ते २ या वेळेत जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, दुरुस्ती मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली हा जनता दरबार भारणार आहे.
दक्षिण मुंबईतील जुन्या, मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींच्या देखभाल-दुरुस्तीची संपूर्ण जबाबदारी म्हाडाच्या दुरुस्ती मंडळावर आहे. आजघडीला अशा अंदाजे १४ हजार इमारती आहेत. या इमारतींशी संबंधित, इमारतीच्या पुनर्विकासाशीसंबंधित भाडेकरूंचे अनेक प्रश्न, तक्रारी असतील तर त्या सोडविण्यासाठी त्यांना आता जनता दरबाराच्या माध्यमातून एक चांगले व्यासपीठ मिळणार आहे. अतिधोकादायक आणि कोसळलेल्या इमारतीतील रहिवासी वर्षानुवर्षे संक्रमण शिबिरात राहत असून त्यांच्याही अनेक समस्या आहेत. तसेच बृहतसूचीवरील घरांच्या वितरणाबाबतही मोठ्या प्रमाणावर भाडेकरू, संक्रमण शिबिरार्थींच्या तक्रारी आहेत. या सर्व तक्रारींवर जनता दरबारात तोडगा निघू शकेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.