लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मुंबईतील घाटकोपर परिसरात महाकाय लोखंडी फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी जाहिरात कंपनीच्या माजी संचालक जान्हवी मराठे यांना सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. यातील मुख्य आरोपी भावेश भिंडे हाही जामिनावर बाहेर असून त्याने प्रकरणातून दोषमुक्त करण्याच्या मागणीसाठी अर्ज केला आहे.

मराठे यांनी आधी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती. मात्र, सत्र न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका फेटाळण्यात आल्यानंतर त्यांना अटक झाली होती. त्यानंतर, त्यांनी सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर मराठे यांनी पुन्हा एकदा जामिनासाठी अर्ज केला. त्यांच्या अर्जावर निर्णय देताना सत्र न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.

आणखी वाचा-बदलापूर प्रकरणी सीआयडीचे वर्तन संशयास्पद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे फलक लावणाऱ्या ईगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेडमध्ये संचालकपदी आपण कार्यरत होतो. परंतु, डिसेंबर २०२३मध्ये पदाचा राजीनामा दिला. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि कंपनीचा विद्यामान संचालक भावेश भिंडे यांच्या कार्यकाळात हे फलक लावण्यात आले. या फलकाबाबतच्या करारावर आपण केवळ स्वाक्षरी केली होती. याच कारणास्तव आपल्यावर कारवाई करण्यात आली. परंतु, या प्रकरणातील खरा गुन्हेगार हा भिंडे असून आपल्याला बळीचा बकरा केले जात असल्याचा दावा मराठे यांनी जामिनाची मागणी करताना केला होता. शिवाय, प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या भिंडे याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे, आपल्यालाही जामीन मंजूर करण्याची मागणी मराठे यांनी केली होती.