मुंबई : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महत्वाच्या ‘चले जाव’ चळवळीत सक्रिय सहभागी झालेले स्वातंत्र्यसैनिक दत्तात्रय गांधी यांचे वृद्धापकाळाने जोगेश्वरी येथील निवासस्थानी निधन झाले. ते १०२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात तीन मुली, एक जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.

दत्तात्रय गांधी यांच्या इच्छेनुसार कुटुंबियांनी मुंबईतील नायर रुग्णालयात त्यांचे देहदान केले.दत्तात्रय गांधी यांचा जन्म १५ मे १९२३ रोजी रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथे झाला. त्यांच्या घरातील सदस्य भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय असल्यामुळे दत्तात्रय गांधी हेही भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सामील झाले आणि महात्मा गांधींच्या विचारांकडे आकर्षित होऊन कार्य करू लागले. ते ८ ऑगस्ट १९४२ रोजी झालेल्या चले जाव चळवळीत सहभागी झाले. या चळवळीनंतर त्यांना अटकही झाली आणि त्यांनी दीड वर्ष तुरूंगवास भोगला. तुरुंगातून सुटून आल्यानंतर त्यांनी साने गुरूजी यांनी स्थापन केलेल्या राष्ट्र सेवा दलात काम केले. त्यानंतर साने गुरुजींच्या सल्ल्यानंतर शिक्षक म्हणून काम सुरू करीत मुंबईतील छबिलदास शाळेत तब्बल ३५ वर्षे अध्यापनाचे कार्य केले. तसेच शिक्षक म्हणून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी समाजप्रबोधनाचे कार्य सुरूच ठेवले. लोकशाही, समता आणि धर्मनिरपेक्षता या विचारानुसार त्यांनी कार्य सुरू ठेवले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दत्तात्रय गांधी यांनी विविध शाळांमध्ये जाऊन शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी मार्गदर्शन करीत विविध उपक्रम राबविले. तसेच विविध सामाजिक संस्थांनाही त्यांनी आर्थिक मदत केली. त्यांच्या निधनाबद्दल विविध क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, स्वातंत्र्यसैनिक दत्तात्रय गांधी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी येत्या १३ जून रोजी सायंकाळी ६ वाजता गोरेगाव (प.) येथील केशव गोरे स्मारक ट्रस्टच्या सभागृहात अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे.