मुंबई : अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा गोपाळकृष्ण गोखले पूल रविवारी ११ मे रोजी पूर्ण क्षमतेने सुरू झाला. पण, आता मुंबईतील इतर पुलांच्या रखडकथा कधी संपणार असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. अंधेरी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते, रहिवासी यांच्या दबावगटामुळे या पुलाचे रखडलेले काम पुढे विक्रमी वेळेत पूर्ण झाले. मात्र मुंबईत सध्या किमान नऊ ते दहा उड्डाणपुलांची कामे सुरू आहेत. त्यापैकी बहुतांशी पूल हे रेल्वे रुळांवरील आहेत. या पुलांची कामे पूर्ण करण्यासाठी रहिवाशांचे असे दबावगट नाहीत. त्यामुळे ही कामे रखडली असून येत्या पावसाळ्यात मुंबईकरांना त्याचा फटका बसणार आहे.
पश्चिम रेल्वेच्या अंधेरी स्थानकावरून जाणाऱ्या गोखले पूलाचा काही भाग २०१८ मध्ये अक्षरश: रेल्वे रुळांवर पडला. या दुर्घटनेत पुलावरून जाणाऱ्या एका महिलेचा अंत झाला. इथून पुढे मुंबईतील रेल्वे स्थानकांवरील उड्डाणपूलांच्या दुर्दशेचा मुद्दा पुढे आला. मग सर्वच रेल्वे स्थानकांवरील उड्डाणपूलांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामुळे २९ पूल धोकादायक आढळले होते. टप्प्याटप्प्याने हे सर्वच पूल बंद करून त्यांची पुनर्बांधणी केली जात आहे. त्यापैकी अंधेरीचा गोखले उड्डाणपूलाचे नोव्हेंबर २०२२ मध्ये बंद करण्यात आला.
या पुलाचे काम इतके रखडले की त्याची खूप चर्चा झाली. गोखले पुलाची पुनर्बांधणी करताना रेल्वेने पुलाची उंची वाढवण्यास सांगितले. त्यामुळे पुलाची उंची वाढवली. मात्र गोखले पूल हा पुढे बर्फीवाला पुलाला जोडलेला होता. गोखले पुलाची उंची वाढल्यामुळे बर्फीवाला पूल आणि गोखले पूल यांच्यात प्रचंड अंतर पडले. पूल जोडणेच मुश्कील झाले. हा पूल जोडण्यासाठी व्हीजेटीआय, आयआयटी सारख्या तंत्रज्ञान श्रेत्रातील तज्ज्ञ संस्थांचीही मदत घेण्यात आली. मग जॅकने पूल उचलून हा पूल जोडावा लागला.
कधी पुलाच्या तुळईचे भाग उशीरा आले, कधी गर्डर बनवणाऱ्या कारखान्यात संप, कधी पावसामुळे गर्डर येण्यास उशीर, प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन अशा अनेक गोष्टींमुळे हा पूल रखडला होता. अंधेरी परिसरातील उच्चभ्रू समाजाने समाजमाध्यमांवरून आपला दबाव गट तयार केल्यामुळे प्रशासनाने या पुलाला प्राधान्य देत हा पूल आता पूर्ण केला आहे. मात्र मुंबईतील इतर पुलांची कामे वर्षानुवर्षे सुरू आहेत.
दरम्यान, अंधेरीच्या गोखले पूलाप्रमाणेच मुंबईतील रेल्वे रुळांवरील अन्य पुलांची कामेही विविध कारणांमुळे रखडलेली आहेत. मशीद बंदर जवळच्या कर्नाक पुलाचे काम अंतिम टप्प्यात असताना गर्डर न आल्यामुळे काम रखडले आहे. या प्रकरणी कंत्राटदाराला दंडही करण्यात आला आहे. रेल्वेच्या रुळांवरील ही कामे रेल्वे आणि पालिका या दोन प्राधिकरणांच्या समन्वयातून होत असतात. मात्र त्यामध्ये अनंत अडचणी येत असल्यामुळे कामे रखडतात. त्याचा फटका रहिवाशांना, नागरिकांना, नोकरदारांना बसत असतो. मुंबईत सध्या एकाचवेळी अनेक पुलांची कामे सुरू असून त्यामुळे येत्या पावसाळ्यात मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकतो.
अंधेरी लोखंडवाला रहिवासी संघटनेने (लोका) आपला एक दबावगट तयार केला होता. त्याद्वारे या पुलाच्या कामासाठी पाठपुरावा केला जात होता. यात स्थानिक आमदार अमित साटम यांनीही याकामामध्ये रहिवाशांच्या या लढ्याला साथ दिली. पालिका अधिकाऱ्यांना पुलाच्या कामाचे वेळापत्रक जाहीर करायला लावणे, वेळेत काम झाले नाही तर त्याचा जाब विचारणे, कितीवेळा पुलाची मुदत हुकली त्याची समाजमाध्यमांवरून माहिती देणे ही कामे या रहिवाशांच्या संघटनेने केली.
पण या पुलाच्या कामामध्ये अधिकाऱ्यांना सूचना करण्याचे कामही केले. त्यांच्या सूचनांचा या कामामध्ये समावेशही करण्यात आला. रहिवासी संघटनेचे धवल शाह यांनी सांगितले की, या पुलाचे काम पूर्ण होण्यासाठी आम्ही घटनास्थळावर सुमारे ३० ते ३५ वेळी प्रत्यक्ष स्थळी भेटी दिल्या, डझनापेक्षाही जास्त वेळा अधिकाऱ्यांची भेट घेतली. पहिल्या टप्प्यातील कामाची मुदत वारंवार हुकल्यानंतर आम्ही आमदारांच्या मदतीने पाठपुरावा करून दुसऱ्या टप्प्यातील काम विक्रमी वेळेत पार पाडण्यास प्रशासनाला भाग पाडले. याच दरम्यान पालिकेत अतिरिक्त आयुक्त पदी आलेल्या अभिजीत बांगर यांनीही या कामाला वेग दिला व सर्वाधिक चर्चेतील हा पूल पूर्ण झाला.
मुंबईत सध्या सुरू असलेली कामे
विक्रोळी, नाहूर, घाटकोपर, शीव या रेल्वे स्थानकात रेल्वे रुळांवरील पुलांची कामे सुरु आहेत. तसेच मुंबई सेंट्रलचा बेलासिस पूल, महालक्ष्मी रेल्वे स्थानकावरील पूल, दादरचा टिळक पूल, रे रोड पूल, भायखळा पूल, मशीद स्थानकाजवळचा कर्नाक पूल, हॅंकॉक पूल अशी विविध रेल्वेवरील उड्डाणपुलांची कामे सुरू आहेत. त्याचबरोबर गोरेगाव येथील मृणालताई गोरे उड्डाणपूलाचा विस्तार, अंधेरी येथील जेव्हीपीडीमधील पूल अशी अन्य प्रमुख पुलांची कामेही प्रगतिपथावर आहेत.