मालगाडी घसरल्याने मंगळवारी कोकण रेल्वे  मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. चिपळूण-कामाठे या स्थानकांदरम्यान मालगाडीचे १२ डबे रुळावर घसरले. या घटनेमुळे दिवसभरातील अनेक गाडय़ा रद्द करण्यात आल्या. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत हे डबे बाजूला करण्याचे काम पूर्ण झाले नसल्याने बुधवारी दिवसभरही या मार्गावरील गाडय़ांच्या वाहतुकीवर परिणाम होणार असल्याचे कोकण रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले. तसेच प्रवाशांनी प्रवास सुरू करण्याआधी आपल्या गाडीची सद्यस्थिती १३९ क्रमांकावर दूरध्वनी करून तपासून घ्यावी, असेही सांगण्यात आले.
जबलपूरहून रत्नागिरीकडे गव्हाची पोती घेऊन जाणारी मालगाडी मंगळवारी सकाळी पावणे आठच्या सुमारास चिपळूण आणि कामाठे स्थानकांजवळ घसरली. या अपघातामुळे १६० मीटर लांबीचे रेल्वेरूळ वाहतुकीच्या दृष्टीने निकामी झाले. या बारा डब्यांमध्ये गव्हाची पोती भरली असल्याने हे डबे उलचण्यात अडचणीही येत होत्या. परिणामी दिवसभर या मार्गावरील वाहतूक विस्कळीत होती.
या दुर्घटनेमुळे दिवसभरात नऊ गाडय़ा रद्द करण्यात आल्या. यात मांडवी एक्सप्रेस,  दिवा-सावंतवाडी-दिवा एक्सप्रेस, जनशताब्दी एक्सप्रेस, दादर-रत्नागिरी-दादर पॅसेंजर या गाडय़ांचा समावेश आहे. मंगळवारी रद्द झालेल्या या गाडय़ांपैकी काही गाडय़ा बुधवारीही रद्द राहण्याची शक्यता आहे.
ट्रान्स शिपमेंटही फायद्याचे
काही गाडय़ा चिपळूण व रत्नागिरीपर्यंतच चालवण्यात आल्या. या गाडय़ांमधील प्रवाशांना पुढील स्थानकापर्यंत एसटीने नेऊन त्यापुढे रेल्वेने इच्छित स्थळी पोहोचवण्याचा ‘ट्रान्स शिपमेंट’चा कार्यक्रमही कोकण रेल्वेने हाती घेतला.