राज्यात औद्योगिक आणि निवासी वीजदर चढे असल्याबाबत नाराजी असताना वीजदर कमी करण्याचा आग्रह राज्य सरकारने धरला आहे. दिल्लीत ‘आप’ने वीजदर कपातीच्या मुद्दय़ावर लोकप्रियता मिळवल्याच्या पाश्र्वभूमीवर राज्यातील वीजदरांबाबतचा लोकांचा आणि उद्योजकांचा संताप कमी करण्याचा  सरकारचा प्रयत्न आहे.
औद्योगिक वीजदरांच्या कपातीबाबत  सोमवारी ‘महावितरण’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली. त्यात वीजदर कपातीचा आग्रह राज्य सरकारने धरल्याचे समजते. त्यावर राज्य सरकारचे अनुदान त्यासाठी अत्यावश्यक राहील, असे ऊर्जा विभागाकडून सांगण्यात आले. त्यावर वीजदर कपातीचे प्रमाण आणि त्यासाठीच्या अनुदानाच्या समीकरणांवर आणि पर्यायांवर चर्चा झाली.