मुंबई: राज्यात गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागांत पूरस्थिती उद्भवली आहे. पावसाचे पाणी शेतात शिरून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे राज्यातील जवळपास १५ लाख एकर पेक्षा जास्त क्षेत्रावरील शेतपिकांचे प्रचंड मोठे नुकसान झाले असून सध्याची परिस्थिती पाहता राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा आणि शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची तातडीने मदत द्या, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

राज्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात सपकाळ यांनी फडणवीस यांना पत्र पाठवले आहे. मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील जवळपास १७ जिल्ह्यांना या पावसाचा मोठा फटका बसला आहे. तसेच उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातही मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. पावसामुळे ज्वारी, बाजरी, उडीद, मका, सोयाबिन, मूग, कापूस, तूर, फळे आणि भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी शेतकऱ्याचे पशूधन वाहून गेले असून नांदेड जिल्ह्यात जिवीतहानीही झाली आहे. आधीच संकटाचा सामना करत असलेल्या बळीराजाला निसर्गाने आणखी संकटात टाकले आहे, असे या पत्रात सपकाळ यांनी नमूद केले आहे.

राज्य सरकारने पंचनामे करण्याचे आदेश दिले असले तरी सरकारने या कठीण प्रसंगी सर्व नियम, अटी आणि शर्थी बाजूला ठेवून शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. जेथे जिवीतहानी झाली आहे त्यांच्या कुटुंबीयांचा सहानुभूतीपूर्ण विचार करून मदत करावी, अशी मागणीही सपकाळ यांनी केली आहे.