मुंबई : सायबर गुन्ह्यासाठी दोन सुशिक्षित तरुणांची व्हिएतनाममध्ये मानवी तस्करीचा करण्याचा प्रयत्न मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अधिकाऱ्यांनी हाणून पाडला. या प्रकरणी सहार पोलिसांनी एका इसमाला अटक केली असून दोन तरुणांची सुटका करण्यात आली. सायबर गुन्हे करण्यासाठी भारतातील सुशिक्षत तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून परदेशात नेण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. असाच एक मानवी तस्करीचा प्रयत्न विमानतळ अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे फसला. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दीप सिंग इमिग्रेशन विभागात काम करतात. रविवारी ते विमानतळाच्या इमिग्रेशन येथील काऊंटर ३ वर तैनात होते. त्यावेळी पार्थकुमार चौहान हा इसम तपासणीसाठी आला. त्याच्यासोबत यश प्रजापती नावाचा एक हा तरूण होता. ते दोघे व्हिएतनमानमधील लाओसला जाणार होते. त्यामुळे सिंग यानी चौकशी केली असता अजय चौहान याने दिलेल्या उत्तरात विसंगती आढळल्याने संशय बळावला. दरम्यान, दुसऱ्या काऊंटरवर आलेला अरुण जिंजाला लाओसला कामासाठी जाण्यासाठी आला होता. अधिकाऱ्यांना हा प्रकार संशयास्पद वाटल्याने या तिघांना पुढील चौकशीसाठी विंग इनचार्ड राजेश चौरसिया यांच्याकडे नेण्यात आले.
त्यांनी केलेल्या चौकशीत हा सायबर गुन्ह्यांसाठी मानवी तस्करीचा प्रकार असल्याचे समोर आले. आरोपी अजय चौहान हा गुजरातमधील यश प्रजापती आणि अरुण जिंजाला या तरुणांना घेऊन व्हिएतनाम येथे जात होता. त्यांना व्हिएतनामधील लाओस शहरातील एका कंपनीत संगणकाविषयक काम करण्याच्या नोकरीचे आश्वासन देण्यात आले होते. त्यासाठी महिना ७० हजार रुपये पगार दिला जाणार होता. मात्र प्रत्यक्षात त्यांना लाओसमध्ये नेऊन सायबर गुन्हे करण्यासाठी भाग पाडले जाणार होते. यश गुजरातमधील सुरत जिल्ह्यातील कटारग्राम येथे रहाणारा आहे तर अरुण सुरतमधील पुनागाम येथील रहिवाशी आहे. या दोघांनी संगणशास्त्रात पदवीचे शिक्षण घेतले आहे. सायबर गुन्ह्यांसाठी दोन तरुणांची मानवी तस्करी करणाऱ्या पार्थकुमार चौहान याच्यावर सहार पोलीस ठाण्यात कलम १४३ (२) आणि १४३ (३) अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. त्याची चौकशी करण्यात येत आहे. यामागील सूत्रधार कोण आहे ? आणखी किती तरुणांची अशा प्रकारे तस्करी करण्यात आली त्याचा तपास करण्यात येत आहे, असे सहार पोलिसांनी सांगितले.
पार्थकुमार चौहान कोण ?
याबाबत माहिती देताना सहार पोलिसांनी सांगितले की, पार्थकुमार चौहान हा गुजरातचा असून यापूर्वी दोन वेळा तो व्हिएतनाममध्ये सायबर गुन्हे करण्यासाठी गेला होता. पहिल्यांदा डिसेंबर २०२२ ते फेब्रुवारी २०२३ या कालावधीत दुबईतील एका दलालामार्फत तो लाओसला गेला होता. तेथे त्याने चॅटींग स्कॅमचे काम केले होते. अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया येथील नागरिकांची क्रिप्टो करन्सीमध्ये (आभासी चलन) गुंतवणूक करण्याच्या निमित्ताने त्याने फसवणूक केली होती. तेथून परतल्यानंतर चौहान मागील वर्षी डिसेंबरमध्ये पुन्हा लाओस येथे गेला होता. तेथे त्याने पुन्हा सायबर फसवणुकीचे काम केले. यावेळेला तो दोन तरुणांची तस्करी करून नेत होता.