मुंबई : नैऋत्य मोसमी वाऱ्यांची गती मंदावल्याने मोसमी पावसाची वाटचालही मंदावली आहे. यामुळे मागील काही दिवसांपासून राज्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. अनेक ठिकाणी अधूनमधून हलक्या सरी बरसत आहेत. दरम्यान, राज्यातील काही भागात पुढील दोन ते तीन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
जून महिन्याच्या सुरुवातीपासून राज्यात मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पावसाचा जोर ओसरल्यामुळे पुन्हा उकाडा आणि उन्हाचा चटका सहन करावा लागत आहे. काही भागात अधूनमधून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. मात्र, मुसळधार पाऊस झालेला नाही. दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवस राज्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यानुसार छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव , चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर राज्याच्या उर्वरित भागात हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज आहे.
मोसमी वाऱ्यांचा प्रवाह जेव्हा कमजोर झालेला असतो तेव्हा आणि वातावरणातील वाढलेल्या आर्द्रतेमुळे तसेच कडक उन्हामुळे शक्यतो विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता अधिक असते. यामुळे काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज दिला असल्याचे हवामान विभागाने सांगितले.
याचबरोबर मराठवाडा आणि तेलंगणा मध्ये हवेच्या वरच्या थरात चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. तर, कोकण किनारपट्टी भागात मोसमी वाऱ्यांचा जोर कमी झालेला आहे त्यामुळे या भागात सध्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली नाही. मुंबईसह ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि रायगड भागात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
मुंबईत पावसाने विश्रांती घेतल्यामुळे उकाड्यात वाढ झाली आहे. तापमानातही चढ उतार सुरू आहेत. हवामान विभागाच्या कुलाबा आणि सांताक्रूझ केंद्रात गुरुवारी शून्य मिमी पावसाची नोंद झाली. दरम्यान, राज्यात मोसमी वारे मुंबई, अहिल्यानगर , बीड, नांदेड, परभणी, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोलीपर्यंत पोहोचले आहेत. मात्र, त्यानंतर मोसमी वाऱ्यांनी वाटचाल केलेली नाही. मोसमी वाऱ्यांची सीमा गुरुवारीही मुंबई, अहिल्यानगर , आदिलाबाद, भवानीपटना, पुरी आणि बालूरघाट या भागात कायम आहे.