मुंबई : अटल सेतूचा वापर सुरू झाल्यानंतर काही काळातच तेथून समुद्रात उडी घेऊन आत्महत्येचे प्रकार सातत्याने घडले होते. आता वरळी येथील कोस्टल रोड – सीलिंक कनेक्टरवर मोटरगाडी उभी करून ३० वर्षीय तरुणाने समुद्रात उडी मारून आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. सागरी सेतू परिसरात तरूणाचा मृतदेह बुधवारी सापडला असून याप्रकरणी वरळी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. मृत तरूण मालाड येथील रहिवासी होता. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी वरळी पोलीस अधिक तपास करत आहेत.

कोस्टल रोडला वांद्रे – वरळी सागरी सेतूशी जोडणाऱ्या कनेक्टरच्या पोल क्रमांक ८० च्या शेजारी एक मोटरगाडी मंगळवारी रात्री आठच्या सुमारास उभी करण्यात आली होती. त्याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने तपासणी केली असता एक व्यक्तीने तेथून उडी मारल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. बोटीच्या साहाय्याने सर्वत्र शोध घेतला, पण रात्र झाल्यामुळे काहीच सापडले नाही. अखेर मोटरगाडीच्या क्रमांकावरून पोलिसांनी माहिती घेतली असता दर्शीत राजूभाई सेठ (३०) हा तरुण मोटरगाडी घेऊन तेथे गेल्याचे समजले.

अखेर पोलीस निरीक्षक शिंदे व वरळी मोबाईल व्हॅन क्रमांक १ ने घटनास्थळी पाहणी केली. बुधवारी सीलिंक लॅन्डिंग पॉईंट येथे एक मृतदेह पाण्यात तरंगत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मोबाईल १ वाहन घटनास्थळी पाठवले. त्यावेळी तेथे एक मृतदेह पाण्यात तरंगत होता. पोलिसांनी तत्काळ अग्निशमन दल व रुग्णवाहिकेला घटनास्थळी बोलावले. त्यानंतर अग्निशमन दलाने वाहनाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. मृतदेह मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात नेला असता तेथील डॉक्टरांनी तरूणाचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या घटनेनंतर वरळी पोलिसांनी याप्रकरणी अपमृत्यूची नोंद केली. त्यानंतर मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना कळवण्यात आले. तरूणाने समुद्रात उडी मारण्यापूर्वी कोणती चिठ्ठी लिहिलेली अद्याप सापडलेली नाही. त्याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

४ महिन्यांपूर्वीच लग्न झाले

दर्शीत राजूभाई सेठ हा मालाड येथील रहिवासी असून पदवीधर तरुण होता. तो बीकेसीमधील एका खासगी कंपनीत कामाला होता. चार महिन्यांपूर्वीच त्याचे लग्न झाले होते. तो मालाड येथे पत्नी व आईसोबत राहत होता. त्याला एक विवाहित बहिण असून तीही मालाड परिसरातच राहते. मंगळवारी कामावरून निघाल्यावर तो बीकेसीवरून वांद्रे-वरळी सीलिंकमार्गे वरळीला आला. सीलिंक कोस्टल रोडला जेथे जोडला जातो, त्या कनेक्टरवर त्याने मोटरगाडी थांबवली व त्यानंतर थोडावेळ उभे राहून थेट समुद्रात उडी मारली.