मुंबई – भारतात घुसखोरी करून बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या दोन बांग्लादेशी महिलांना किल्ला न्यायालयाने ५ महिने साधी कैद आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. जानेवारी महिन्यात घाटकोपर येथून या महिलांना अटक करण्यात आली आहे. हा खटला जलदगती न्यायालयात (फास्ट ट्रॅक) चालविण्यात आला होता. अवघ्या ५ महिन्यात त्यांच्यावरील आरोपी सिध्द करून ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.
घाटकोपर पश्चिमेच्या वैतागवाडी आणि पूर्वेच्या रेल्वे रूळ परिसरात काही संशयित बांग्लादेशी नागरिक रहात असल्याची माहिती गुन्हे प्रकटीकरण कक्ष ४ (ॲण्टॉप हिल) च्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने २ जानेवारी रोजी छापा टाकून चांदनी मजी (२४) आणि तस्लिमा मोडोल (४१) या दोन महिलांना ताब्यात घेतले होते. त्यांनी बेकायदेशीररित्या भारतात प्रवेश केला होता आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय नाव धारण करून आपली ओळख लपवली होती. पोलिसांनी केलेल्या तपासात त्या बांग्लादेशी नागरिक असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यांच्याविरोधात घाटकोपर पोलीस ठाण्यात फसवणुक केल्याप्रकरणी कलम भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८ (४) ,बनावट कागदपत्रे बनविल्या प्रकरणी कलम ३३६ (२), ३३६ (३) ३४० (२) ३ (५), परकिय नागरिक कायदा १९४६ च्या कलम १४ (ए) (बी), १४ (सी), पारपत्र अधिनियम १९६७ चे कलम १२ (१) (सी) तसेच भारतात बेकायदेशीररित्या प्रवेश केल्याप्रकऱणी कलम ३ (अ) अन्वये गुन्हे दाखल केले होते.
या गुन्ह्याचा तपास करून १ मार्च रोजी किल्ला न्यायालयात दोषारोपपत्र (चार्जशिट) दाखल करण्यात आले होते. अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांनी हा खटला जलदगती न्यायालयात (फास्ट ट्रॅक) चालवला. दोन्ही महिला या बांग्लादेशच्या नागरिक असून त्यांनी बेकायदेशीररित्या प्रवेश केल्याचे पुरावे पोलिसांनी न्यायालयात सादर केले. ते ग्राह्य धरून न्यायालयाने या दोन्ही बांग्लादेशी महिलांना ५ महिने साधी कैद आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त (गुन्हे प्रकटीकरण) राजतिलक रोशन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुत्त (डी-मध्य) सुनिल चंदमोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक लता सुतार, पोलीस निरीक्षक नितीन कुंभार, सहाय्यक पोलीस निरीक्षक भिसे, पल्लवी कोतवाल आदींच्या पथकाने केली होती.