मुंबई : मुंबईमध्ये करोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत. त्यामुळे नागरिकांमध्ये काही प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. करोनाबांधतांची संख्या वाढली असली तरी करोनाची साथ पसरेल अशी कोणतीही शक्यता नाही. तसेच करोना आता तापाप्रमाणेच झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही, असे मत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

मागील काही दिवसांपासून बाह्यरुग्ण विभागामध्ये ताप आणि खोकल्याचा त्रास होत असलेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. या रुग्णांची तपासणी केली असता काही जण चाचणी अहवालानुसार करोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. मात्र या सर्व रुग्णांना गृहविलगीकरणामध्ये ठेवण्यात आले असून, ते काही दिवसांतच पूर्ण बरे झाले आहेत. त्यामुळे करोनाची साथ पसरेल अशी कोणतीही शक्यता नाही. करोनाच्या विशेषतः ओमिक्रॉन विषाणूच्या लाटेनंतर करोना वेगवेगळ्या टप्प्यांत दिसून येत आहे. सध्या दिसणारी परिस्थिती ही ऋतू बदल किंवा टप्प्यांतील बदलाचे एक लक्षण असू शकते. त्यामुळे रुग्णसंख्येत थोडी वाढ झाली आहे. नागरिकांनी घाबरण्यासारखी परिस्थिती नाही, असे सर एच.एन. रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयाचे क्रिटिकल केअर विभागप्रमुख डॉ. राहुल पंडित यांनी सांगितले.

करोना आता सर्वसाधारण तापासारखा झाला आहे. त्यामुळे करोनाच्या रुग्णांची संख्या वाढली तरी साथ पसरण्याची शक्यता नाही. दरवर्षी पावसाळा सुरू होण्याच्या कालावधीत तापाची साथ पसरते, त्याप्रमाणे यापुढे करोनाचे काही प्रमाणात रुग्ण आढळतील. त्यामुळे नागरकांनी घाबरण्याची गरज नाही. मात्र ज्या व्यक्ती मधूमेह, रक्तदाब, क्षयरोग, श्वसनाचे आजार अशा अनेक सहव्याधींनी त्रस्त आहेत, अशा व्यक्तींनी काळजी घेण्याची गरज आहे. त्यांनी गर्दीच्या ठिकाणी जाताना मुखपट्टीचा वापर करण्याची आवश्यकता असल्याचा सल्ला इंडियन सोसायटी क्रिटिकल केअरचे मुंबईचे सचिव डॉ. भरत जगियासी यांनी दिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रदूषण आणि आर्द्रतेमुळे वातावरणात विषाणू आणि जीवाणू अधिक काळ टिकून राहू शकतात, ज्यामुळे संसर्गाचा धोका वाढतो. विशेषतः थंड हवामान किंवा प्रदूषित परिसरात संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. सध्या रुग्णालयांमध्ये श्वसनाशी संबंधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेषतः हृदय किंवा फुफ्फुसांचे विकार असलेल्या रुग्णांना अधिक त्रास होत आहे. यातील काही रुग्णांमध्ये सौम्य स्वरूपातील लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्येत किंचित वाढ झाली आहे. मात्र ही वाढ गंभीर स्वरुपाची नाही. बहुतेक नागरिकांमध्ये करोनाविरोधात प्रतिकारशक्ती निर्माण झालेली आहे. तसेच हंगामी फ्लूप्रमाणेच करोनाही सामान्य झाल्याचे सल्लागार चिकित्सक डॉ. दीपेश अग्रवाल यांनी सांगितले.