मुंबई : डोंबिवली येथे घरांच्या किमती वाढल्याने, जवळील रेल्वे स्थानक दिवा येथे स्वस्तातील घरे घेण्यास नागरिकांनी पसंती दर्शवली. त्यानंतर हळूहळू बेसुमार चाळी, बांधकामे, इमारती उभ्या झाल्याने गर्दीचा लोंढा वाढला. गेल्या काही वर्षात दिव्यातील लोकांची संख्या वाढल्याने, दिव्यातून प्रवाशांचा प्रवास गर्दीचा होऊ लागला. गर्दी विभाजित करण्यासाठी जलद लोकलला दिवा स्थानकात थांबा देण्यास सुरुवात झाली. कसारा, आसनगाववरून सुटणाऱ्या जलद लोकलला दिवा येथील थांबा असल्याने, लोकलमध्ये गर्दीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे जलद लोकलला दिवा येथील थांबा रद्द करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.
सोमवारी दुर्घटना घडली त्या लोकलला दिवा येथे थांबा असल्याने तेथे बरेच प्रवासी लोकलमध्ये चढले. त्यामुळे लोकलमधील प्रवाशांची संख्या वाढली. त्यामुळे मुंब्रा येथे लोकलमधून पडून प्रवाशांचा मृत्यू झाला, असे मत प्रवाशांनी व्यक्त केले.
सध्या दिव्यावरून सुमारे १ लाख ३० हजार प्रवाशांचा प्रवास होतो. दिव्यावरून एकूण ४९० लोकल धावतात. यामध्ये दिवा डाऊन धीम्या २२३ लोकल फेऱ्या, अप धीम्या २१५ लोकल फेऱ्या धावतात. तर, २५ अप आणि २७ डाऊन जलद लोकलला दिवा येथे थांबा दिला जातो. या ५३ लोकल फेऱ्यांना दिवा येथे थांबा दिल्याने, या जलद लोकलमध्ये गर्दीचे प्रमाण वाढले आहे.
कसारा, आसनगाव येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या जलद लोकलला दिवा थांबा बंद करावा. दिवा येथे थांबा दिल्याने, लोकलमधील गर्दीचे प्रमाण वाढते. तसेच ठाण्याला उतरणाऱ्या प्रवाशांचे देखील यावेळी हाल होतात.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.दिनेश घरत, प्रवासी