मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भगवान रामाबद्दल केलेल्या कथित आक्षेपार्ह विधानाबद्दल मुंबई पोलिसांनी शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल केला. याप्रकरणी बजरंग दलाचे समन्वयक गौतम रावरिया यांनी मुंबईतील एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

बहुजनांचे भगवान राम हे मांसाहारी असल्याचे आव्हाड यांनी ३ जानेवारीला वक्तव्य केले होते. शिर्डीतल्या मेळाव्यात ते बोलत होते. राम हा आमच्या बहुजनांचा राम आहे. मी जे काही बोललो ते अभ्यासाशिवाय बोललो नाही असे आव्हाड यांनी म्हटले आहे. आमचा राम जात-पात न मानणारा आहे, शबरीची बोरे खाणारा आहे, जे राम-राम करत आहेत त्यांना मी सांगेन की तुमचा राम तुम्हाला निवडणुकीसाठी बाजारात आणायचा आहे, आमचा राम आमच्या जन्मापासून आमच्या हृदयात आहे असे आव्हाड यांनी म्हटले आहे. तसेच वाल्मिकी रामायणाचा दाखला देत जितेंद्र आव्हाड यांनी आपण काहीही चुकीचे बोललो नाही असेही म्हटले आहे.

हेही वाचा : गोष्ट मुंबईची, भाग १४२: भूराजकीय महत्त्वाचे गेटवे ऑफ इंडिया आहे तरी कुठे?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील आव्हाड यांनी भगवान राम यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यामुळे माझ्या आणि लोकांच्या धर्माच्या भावना दुखावल्या आहेत,”असे रावरिया यांनी तक्रारीमध्ये म्हटले आहे. त्यानुसार एका समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी आव्हाड यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम २९५ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. नुकतेच पुणे पोलिसांनीही याच भाषणासाठी आव्हाड यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला होता. पुणे पोलिस गुन्ह्यांमध्ये तक्रारदार भाजप नेत्याने अयोध्येत २२ जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटनाची तयारी सुरू असताना आव्हाड यांनी हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत, असा दावा केला होता.