मुंबई : यंदा पावसाचे आगमन लवकर झाल्यामुळे मुंबई महापालिकेचे नियोजन बिघडले आहे. यंदा खड्डे भरण्याच्या कामालाही अद्याप सुरूवात झालेली नाही. पावसाळापूर्व खड्डे भरण्याच्या कामांना आता सुरूवात होणार आहे. सर्व २२७ निवडणूक प्रभागातील नियुक्त दुय्यम अभियंत्यांनी नेमून दिलेल्या क्षेत्रात दररोज दौरा करावा. स्वयंप्रेरणेने, अधिक सक्रियपणे (Proactively) खड्डे शोधावेत. खड्डे छोट्या आकारांचे असतानाच ते भरावेत, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत. रस्त्याची चाळण झाल्याचे निदर्शनास आल्यास कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही गगराणी यांनी दिला आहे.
मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात पडणाऱ्या खड्ड्यांमुळे मुंबई महापालिकेवर टीका होत असते. त्यामुळे दरवर्षी पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून खड्डे भरण्यासाठी निविदा मागवून कंत्राट दिले जाते. यंदा पाऊस लवकर आल्यामुळे मुंबई महापालिकेची पावसाळापूर्व कामे रखडलेली आहेत. मात्र खड्डे भरण्याच्या कामांना पालिकेकडूनच उशीर झाला आहे. दरवर्षी एप्रिल महिन्यात सुरू केली जाणारी निविदा प्रक्रिया यंदा मे महिन्यात सुरू केली आहे. ही निविदा प्रकिया मे महिन्याच्या अखेरीस पूर्ण करून नुकतेच कार्यादेश देण्यात आले आहेत. खड्डे भरण्याच्या कामांना आता सुरूवात झाली आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी रस्ते व वाहतूक विभागाच्या अभियंत्यांची सोमवारी बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी खड्ड्यांविषयी विविध निर्देश दिले.
महानगरपालिका आयुक्त गगराणी म्हणाले, जोरदार व सततच्या पावसाने रस्त्यांवर होणारे खड्डे भरण्याकामी कंत्राटदार नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. संबंधित कंत्राटदारांकडून रस्त्यावरील खड्डे तातडीने भरले जातील, यासाठी दुय्यम अभियंत्यांनी सजग राहिले पाहिजे. रस्त्यावरील खड्ड्यांची समस्या निकाली काढण्यासाठी, खड्डे मुक्त रस्ते असावेत यासाठी, मुंबई महानगरातील रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे प्रतिवर्षी खड्ड्यांची संख्या आणि समस्या हळूहळू कमी होत आहे. भविष्यात अधिकाधिक रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण होऊन खड्डय़ांची समस्या निश्चितच कमी होणार आहे. सन २०२३, २०२४ आणि २०२५ या तीनही वर्षांमध्ये प्रतिवर्ष खड्डे भरण्याकामी केल्या जाणा-या खर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. नागरिकांची विशेषतः वाहनधारकांची गैरसोय होऊ नये म्हणून रस्ते विभागाचा संपूर्ण चमू रस्त्यांच्या देखभाल आणि दुरूस्तीसाठी प्रत्यक्ष कार्यस्थळी सतत तैनात असावा. खड्डे बुजवण्याची कामे करताना विविध विभागांनी आपसात समन्वय व नियोजन राखावे, असेदेखील गगराणी यांनी सांगितले.
प्रत्येक अभियंत्याकडे १० ते १५ किमी रस्त्याची जबाबदारी
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर म्हणाले, २२७ प्रभागातील दुय्यम अभियंत्यांकडे प्रत्येकी १० ते १५ किलोमीटर रस्त्यांची जबाबदारी आहे. फक्त कार्यालयात बसून कोणीही कामकाजाचा आढावा घेऊ नये. प्रत्यक्ष कार्यस्थळास वारंवार भेट देऊन परिस्थिती नियंत्रणात राहील हे निश्चित करावे. खड्डयाच्या दृष्टीकोनातून रस्त्याची पाहणी करताना दुय्यम अभियंत्यांनी दोन दिवसातून एकदा दुचाकीवरून दौरा करावा. जेणेकरून रस्त्याचा संपूर्ण विस्तार नजरेखाली येऊ शकेल. रस्त्याची स्थिती कळू शकेल. स्वयंप्रेरणेने, अधिक सक्रियपणे खड्डे शोधून ते वेळीच भरावेत. तक्रार आल्यानंतर खड्डे भरणे ही अस्वीकारार्ह बाब आहे. अभियंत्यानी सक्रियपणे खड्डे शोधून ते तातडीने भरल्यास नागरिकांना असुविधेचा सामना करावा लागणार नाही.
शनिवारी, रविवारी खड्डे भरावेत …
खड्डे भरण्याची कार्यवाही आठवडाभर सुरू राहणार असली तरी शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवशी खड्डे बुजविण्याची कामे अधिक वेगाने करावीत, असे निर्देश बांगर यांनी दिले. शनिवारी आणि रविवारी इतर दिवसांच्या तुलनेत वाहतुकीची वर्दळ कमी असते. त्यामुळे या दोन्ही दिवशी खड्डे बुजविण्याची कार्यवाही अधिक वेगाने करावी. रस्त्यांची चाळण झालेली, खड्ड्यात रस्ता अशा बाबी खपवून घेतल्या जाणार नाहीत. संबंधितांवर अत्यंत सक्त कारवाई केली जाईल. कोणत्याही परिस्थितीत अशी स्थिती उद्भवणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी ताकीद देखील अतिरिक्त महानगरपालिका अभिजित बांगर यांनी दिली.