मुंबई : अफगाणिस्तान, पश्चिम राजस्थानमध्ये सक्रीय असलेला पश्चिमी विक्षोप (थंड वाऱ्याचा झोत) अरबी समुद्रमार्गे उत्तर महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता असल्यामुळे सोमवारपासून (३ फेब्रुवारी) तीन दिवस उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची आणि तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिमेकडून थंड वाऱ्याचा झोत अरबी समुद्रावरून गुजरात मार्गे उत्तर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या दिशेने वाटचाल करण्याची शक्यता आहे. दुसरीकडे बंगालच्या उपसागरावरून येणारे बाष्पयुक्त वारे मध्य प्रदेशपर्यंत पोहचत आहे. अरबी समुद्रावरून येणारे थंड वारे सोबत बाष्पही वाहून आणणार आहेत. अरबी समुद्रावरून येणारे थंड वारे आणि बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याची धुसळण (टक्कर) पश्चिम मध्य प्रदेश आणि नंदूरबार, धुळे, जळगावच्या उत्तर भागात होऊन सोमवार, मंगळवार आणि बुधवार, या तीन दिवसांत (३ ते ५ फेब्रुवारी) तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा आणि तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज आहे.

आठवडाभर ढगाळ वातावरण

राज्यात पुढील आठवडा ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. सध्या बंगालच्या उपसागरातून ताशी ३० ते ३५ किलोमीटर वेगाने आर्द्रतायुक्त वारे महाराष्ट्राच्या दिशेने येत आहेत. त्यामुळे राज्याच्या बहुतेक भागात पुढील आठवडाभर ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. हलक्या पावसाची शक्यता केवळ उत्तर महाराष्ट्रात आहे. राज्याच्या उर्वरीत भागात फक्त ढगाळ हवामान राहून किमाल- किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे, अशी माहिती निवृत्त हवामान शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हवामान विभाग सुधारीत अंदाज वर्तवविणार

पश्चिमी थंड वाऱ्यामुळे पुढील आठवड्यात उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका पाऊस होण्याचा अंदाज आहे. गारपीट विषयक अंदाज अद्याप वर्तविलेला नाही. पुढील दोन दिवसांतील हवामान विषयक स्थितीचा अभ्यास करून सुधारीत अंदाज व्यक्त केला जाईल, अशी माहिती हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप यांनी दिली.