मुंबई : नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गातील इगतपुरी – आमणे या शेवटच्या टप्प्याचे गुरुवारी लोकार्पण झाले असून आता ७०१ किमी लांबीचा समृद्धी महामार्ग सेवेत दाखल झाला आहे. या महामार्गामुळे नागपूरवरून ठाण्यातील आमणेपर्यंत अतिजलद प्रवास शक्य झाला आहे. मात्र मुंबईकर, ठाणेकरांना समृद्धी महामार्गाचे प्रवेशद्वार अर्थात आमणे गाठणे, तसेच नागपूरवरून अतिजलद आमणेपर्यंत आल्यानंतर पुढे ठाणे, मुंबई गाठणे कठीण झाले आहे. नाशिक – ठाणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ वरील माजिवडा – वडपे महामार्गाच्या आठपदरीकरणाचे काम अद्याप अपूर्ण आहे. त्यामुळे वडपे – माजिवडादरम्यान वाहनांना प्रचंड वाहतूक कोंडीत अडकून रहावे लागत आहे. या वाहतूक कोंडीतून सुटका होण्यासाठी, समृद्धी महामार्गाचे प्रवेशद्वार अर्थात आमणे गाठण्यासाठी वाहनचालक – प्रवाशांना नोव्हेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. माजिवडा – वडपे महामार्गाच्या आठपदरीकरणाचे आतापर्यंत ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम पूर्ण करून नोव्हेंबरमध्ये महामार्ग पूर्ण क्षमतेने खुला करण्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) नियोजन आहे.

मागील काही वर्षांत नाशिक – ठाणे राष्ट्रीय महामार्ग ३ वरून प्रवास करणाऱ्या वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. वाढत्या वाहन संख्येला सामावून घेण्यासाठी महामार्ग अपुरा पडत असल्याने येथे वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) राष्ट्रीय महामार्ग ३ वरील माजीवाडा – ठाणे दरम्यानच्या २३.५ किमी मार्गाचे आठपदरीकरण करण्याचा निर्णय घेतला. एका कंत्राटदाराची २०१९ मध्ये निवड करून कंत्राट देण्यात आले. मात्र कंत्राटदाराने कामच सुरू केले नाही आणि प्रकल्प रखडला. अखेर २०२१ मध्ये या प्रकल्पाची समृद्धी महामार्गाच्यादृष्टीने असलेली गरज पाहता एमएसआरडीसीने हा प्रकल्प मार्गी लावण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार २०२१ मध्ये या प्रकल्पाची जबाबदारी एमएसआरडीसीकडे आली. मात्र या प्रकल्पासाठी वन विभागाची परवानगी मिळविण्यासाठी विलंब झाल्याने एमएसआरडीसीकडून २०२२ मध्ये अंदाजे ११०० कोटी रुपये खर्चाच्या आठ पदरीकरणाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. दरम्यान या प्रकल्पाच्या खर्चासाठी आवश्यक अंदाजे ११०० कोटी रुपये निधी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने उपलब्ध करून दिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माजिवडा – वडपे महामार्गाच्या आठपदरीकरणाचे काम आतापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र अनेक कारणांमुळे यास विलंब झाला. आता ७०१ किमी लांबीचा समृद्धी महामार्ग सेवेत दाखल झाला आहे. या महामार्गाने नागपूरवरून अतिजलद प्रवास करत येणाऱ्या वाहनांना आमणेनंतर ब्रेक लागत आहे. तर मुंबई, ठाण्यावरून समृद्धी महामार्गाचे प्रवेशद्वार अर्थात आमणे गाठण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. बराच वेळ वाहतूक कोंडीत अडकावे लागत आहे. त्यामुळे वाहनचालक – प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी असून आमणे – माजिवडादरम्यानची वाहतूक कोंडी दूर करण्याची, तसेच माजिवडा – वडपे महामार्गाचे आठपदरीकरण शक्य तितक्या लवकर मार्गी लावण्याची मागणी होत आहे. याविषयी एमएसआरडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांनी या प्रकल्पाचे आतापर्यंत ७५ टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती ‘लोकसत्ता’ला दिली. प्रकल्पातील कशेळी खाडी पुलाचे ७५ टक्के, तर कळवा खाडी पुलाचे ९५ टक्के काम पूर्ण झाल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच आता कामाला वेग दिला असून उर्वरित काम नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. आठपदरीकरणाचे काम नोव्हेंबरमध्ये पूर्ण होणार असल्याने वाहनचालक – प्रवाशांना नाशिक – ठाणे, आमणे – ठाणे सुसाट प्रवासासाठी नोव्हेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.