लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मुंबईमधील प्रार्थनास्थळे, विशेषत: शहरातील मशिदी आणि मंदिरांमधील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. गुप्ताचर विभागाने दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीची उपाययोजना म्हणून मुंबईतील बंदोबस्तात वाढ करण्यात आली. दरम्यान, काही दिवसांपूर्वी हाजीअली दर्ग्याच्या कार्यालयात दूरध्वनी करून एकाने बॉम्ब ठेवल्याची धमकी दिली होती. त्यामुळे गर्दीची ठिकाणे आणि प्रार्थनास्थळ परिसरात मॉक ड्रिल करण्यात येणार असून सर्व पोलीस उपायुक्तांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील सुरक्षा व्यवस्थेवर लक्ष ठेवले आहे,

दक्षिण मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तथापि, ही कारवाई एक सुरक्षा कवायत होती. आगामी सणासुदीचा काळ आणि लवकरच होवू घातलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन क्रॉफर्ड मार्केट आणि शहरातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा कवायती करण्यात येत आहेत, असे पोलिसांनी स्पष्ट केले. मात्र अधिक तपशीलवार माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला.

आणखी वाचा-पुनःप्रदर्शित चित्रपटांची दोन महिन्यांत ५० कोटींची उलाढाल

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने चेंबूरमधील मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली, तर पोलिसानी सकाळी तपासणी केल्यानंतर माटुंगा येथील मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आले. महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यादृष्टीने मुंबईत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हाजी अली दर्गा धमकी प्रकरणी गुन्हा

हाजी अली दर्ग्याचे प्रशासकीय अधिकारी मोहम्मद अहमद ताहेर शेख (४२) यांच्या तक्रारीवरून ताडदेव पोलिसांनी बुधवारी गुन्हा दाखल केला. भारतीय न्याय संहिता कलम ३५१(२), ३५२, ३५३(२), ३५३(३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. मंगळवारी व बुधवारी दोन धमकीचे दूरध्वनी आरोपीने केले होते. त्यासाठी दोन वेगवेगळ्या मोबाइलचा वापर करण्यात आला होता. पण दूरध्वनी करणारी व्यक्ती एकच असल्याचे तक्रारीत शेख यांनी म्हटले आहे. प्रथम २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास तक्रारदारांच्या मोबाइलवर आरोपीने दूरध्वनी केला होता. संकेतस्थळावरून त्याने शेख यांचा मोबाइल मिळवल्याचा संशय आहे. ‘दिल्लीवरून मी पवन बोलत आहे. हाजी अली दर्ग्यामध्ये बॉम्ब ठेवला असून दर्गा लवकरात लवकर रिकामा करा. दर्गा रिकामा न केल्यास बॉम्बने उडवून देण्यात येईल. कोणी मध्ये आल्यास त्याला गोळी मारून ठार करण्यात येईल’, असे आरोपीने दूरध्वनीवरून धमकावले. त्यानंतर पुन्हा एकदा आरोपीने दूरध्वनी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.