मुंबई : यंदा देशातील उन्हाळी हंगामातील पिकांची लागवड बारा लाख हेक्टरने वाढून ८३.९३ लाख हेक्टरवर गेली आहे. देशभरात दरवर्षी उन्हाळी हंगामात सरासरी ७१.३४ लाख हेक्टरवर लागवड होते. गतवर्षी ७४.७२ लाख हेक्टरवर लागवड झाली होती.
देशात खरीप, रब्बी हे शेतीचे मुख्य हंगाम असलेले तरीही अनेक भागांत पाण्याची उपलब्धता आणि सिंचनाची सोय पाहून उन्हाळी लागवड केली जाते. उन्हाळी लागवडीचे सरासरी क्षेत्र ७१.३४ लाख हेक्टर आहे. गतवर्षी ७१.३४ लाख हेक्टरवर पेरणी झाली होती, यंदा त्यात १२.५९ लाख हेक्टरने वाढ होऊन ८३.९३ लाख हेक्टरवर लागवड झाली आहे.
उन्हाळी हंगामात भाताचे क्षेत्र सर्वाधिक असते. ईशान्य भारत, किनारपट्टीसह महाराष्ट्रात उन्हाळी भाताची लागवड केली जाते. यंदा भाताची लागवड ३५.८६ लाख हेक्टरवर गेली आहे. सरासरीच्या तुलनेत भात लागवड पाच लाख हेक्टरने वाढली आहे. त्याखालोखाल डाळींची लागवड २४.२५ लाख हेक्टरने वाढली आहे. त्यात हिरवे मूग २१ लाख हेक्टर, काळे मूग ३.०७ लाख हेक्टर आणि अन्य कडधान्यांची लागवड ०.१८ लाख हेक्टरवर झाली आहे. उत्तर भारतात उन्हाळ्यात नद्यांच्या काठावर आणि पात्रात मुगाची लागवड मोठ्या प्रमाणावर होते. अडीच महिन्यांत पिक निघत असल्यामुळे नद्यांना पावसाचे पाणी येण्यापूर्वी पिकांची काढणी होते. सिंचनासाठी नद्यांमधील पाण्याचा वापर केला जातो.
श्रीअन्न म्हणजे पौष्टिक तृणधान्यांची लागवड सुमारे चार लाख हेक्टरने वाढून १४.३७ लाख हेक्टरवर गेली आहे. त्यात ज्वारी ४८ हजार हेक्टर, बाजरीची ४.९० लाख हेक्टर, नाचणीची १६ हजार हेक्टर, लहान तृणधान्ये दोन हजार हेक्टर आणि मक्याची लागवड ८.८० लाख हेक्टरवर गेली आहे. तृणधान्यांसारखीच तेलबियांच्या लागवडीत एक लाख हेक्टरने वाढ होऊन ९.४५ लाख हेक्टरवर लागवड झाली आहे. भुईमुगाची लागवड ४.३१ लाख हेक्टर, सूर्यफुलाची लागवड ३६ हजार हेक्टर, तिळाची लागवड ४.७० लाख हेक्टर आणि अन्य तेलबियांची लागवड सात हजार हेक्टरवर झाली आहे.
लागवड का वाढली
यंदा देशभरात उन्हाळी पाऊस चांगला झाला आहे. त्यामुळे सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता वाढली आहे. शिवाय ठिबक, तुषार सिंचनासारख्या सोयींमध्ये वाढ झाली आहे. उत्तरेत नद्यांचे पाणी कमी झाल्यानंतर नदी पट्ट्यातील गाळामध्ये मूग, तीळ, भुईमूगाची लागवड केली जाते. अडीच – तीन महिन्यांत पिके काढणीला येतात. उन्हाली हंगामात भात मुख्य पिक असून, प्रामुख्याने देशाच्या किनारपट्टीच्या भागात उन्हाळी भात लागवडीचे क्षेत्र मोठे आहे. सिंचनाच्या वाढत्या सोयींमुळे उन्हाळी हंगामातील क्षेत्रात सतत वाढ होत आहे.