भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या ट्वीटवरून सडकून टीका केलीय. तसेच नवाब मलिकांनी घोटाळा केला असेल तर त्यांच्या घरी सरकारी पाहुणे येणार नाहीत, तर त्यांना सरकारी पाहुणा होण्याचा मान मिळेल, असा टोलाही सोमय्यांनी लगावला. किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत मलिकांवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

किरीट सोमय्या म्हणाले, “”ठाकरे सरकारचे मंत्री नवाब मलिक माझ्या घरी सरकारी पाहुणे येणार, अधिकारी येणार म्हणून ट्वीट करत आहेत. त्यांना इतकी भीती का वाटत आहे? तुम्ही नवाब असो वा मालिक, घोटाळा केला असेल, पुणे वक्फ बोर्ड जमीन घोटाळ्यात तुमचा काही सहभाग असेल, मनी लाँड्रिंग केलं असेल, तर तुमच्या घरी सरकारी पाहुणे येणार नाहीत, तुम्हाला सरकारी पाहुणा होण्याचा मान निश्चित मिळेल. मग तुम्ही कोणत्या तुरुंगात राहणार हे कोर्ट ठरवेल.”

नवाब मलिक काय म्हणाले होते?

माझ्या घरी सरकारी पाहुणे येणार आहेत असं म्हणत मलिकांनी ईडी छाप्याचा अंदाज वर्तवला होता. तसेच आम्ही न घाबरता पाहुण्याचं स्वागत करू असंही त्यांनी म्हटलं. या ट्वीटमध्ये नवाब मलिकांनी “गांधी लड़े थे गोरों से, हम लड़ेंगे चोरों से” असं म्हणत मोदी सरकारवर अप्रत्यक्ष निशाणा साधला होता.

नवाब मलिक म्हणाले होते, “मी ऐकलंय की आज उद्या माझ्या घरी सरकारी पाहुणे येणार आहेत. आम्ही त्यांचं स्वागत करू. घाबरणं म्हणजे दररोजचं मरणं आहे. आम्हाला घाबरायचं नाही, तर लढायचं आहे. गांधी गोऱ्यांसोबत लढले, आम्ही चोरांसोबत लढू.”

“वफ्फ बोर्ड घोटाळ्यात भाजपा नेत्यांचा सहभाग”

दरम्यान, वफ्फ बोर्ड प्रकरणी बोलताना नवाब मलिक म्हणाले होते, “किरीट सोमय्या पुण्यातील वफ्फ बोर्डात नवाब मलिक यांनी घोटाळा केला आहे असा आरोप करत आहेत. किरीट सोमय्यांना मला हे सांगायचं आहे की पुढील आठवड्यात वफ्फ बोर्ड घोटाळ्यात भाजपाच्या एका नेत्याच्या विरोधात गुन्हा दाखल होईल. त्याला अटक होईल, मग ईडीलाही बोलवा. त्यातून बरीच माहिती समोर येईल.”

हेही वाचा : “सुना है, मेरे घर आज कल में…”, नवाब मलिक यांच्या नव्या ट्वीटनंतर चर्चांना उधाण

“ईडीने किरीट सोमय्या यांना प्रवक्ता केलं असेल तर अधिकृतपणे जाहीर करा”

“माझ्या माहितीप्रमाणे शुक्रवारी (१० डिसेंबर) एका वफ्फ बोर्डाच्या अधिकाऱ्याला बोलावण्यात आले. तसेच तुम्ही एफआयआर चुकीची नोंदवल्याचं ईडीने अधिकाऱ्याला सांगितलं. ज्या लोकांनी ७ कोटी रुपये लुटले त्याच लोकांची शिफारस ईडीचे अधिकारी करत आहेत. ईडीने किरीट सोमय्या यांना त्यांचा प्रवक्ता बनवलं असेल तर अधिकृतपणे जाहीर करा. ईडी महाराष्ट्रात खेळ करत आहे. ते जर खरंच काही कारवाई करत असतील तर अधिकृत प्रेस नोट काढा. केवळ कुजबुज करून, माध्यमांमध्ये बातम्या पेरून महाराष्ट्रातील मंत्र्यांना आणि महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचं काम बंद करा,” असं नवाब मलिक यांनी सांगितलं.