डोंबिवलीचे भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांच्यापासून आपल्या जिवाला धोका असल्याने आपण पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. शिवसेनेचे कल्याणमधील नगरसेवक रवींद्र पाटील यांनी माझ्या मुलाचे नाशिक येथून अपहरण करून त्याला डोंबिवलीत आणले. परीक्षेच्या तणावाखाली असलेला माझा मुलगा प्रतीकला आमदार चव्हाण यांनी बेसुमार शिवीगाळ केली असल्याचा आरोप भाजपच्या नगरसेविका अर्चना कोठावदे यांनी पालिकेत पत्रकारांशी बोलताना केला.
कुटुंबीयांना सांगून मी बंगळुरू येथे व्यक्तिगत कामासाठी गेले असताना, भाजपचे डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी आपण बेपत्ता असल्याची खोटी तक्रार पोलीस ठाण्यात करून आपली बदनामी केली. माझ्या मुलाची नाशिक येथे परीक्षा सुरू असताना शिवसेनेचे कल्याणमधील नगरसेवक रवी पाटील व नाशिकमधील सेनेचे दोन नगरसेवक यांनी माझ्या मुलाला नाशिकहून डोंबिवलीत आणून माझा पत्ता शोधण्याचा प्रयत्न केला. ‘तुला मारून टाकले तर तुझी आई धावत येईल,’ असे सांगत अर्वाच्य शिवीगाळ रवींद्र चव्हाण यांनी माझ्या मुलाला केली. चव्हाण, सेनेचे नगरसेवक रवी पाटील यांच्याविरुद्ध अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार आहोत, अशी माहितीही अर्चना कोठावदे यांनी दिली.
बंगळुरूला जाण्यापूर्वी आपण सभापतीपदाचे युतीचे इच्छुक उमेदवार दीपेश म्हात्रे यांना मतदानाच्या दिवशी येणार आहोत, असे सांगितले होते. असे असताना या निवडणुकीच्या चार दिवस अगोदर माझ्या दारात आमदार चव्हाण त्यांच्या फौजफाटय़ासह पक्षादेश देण्यासाठी नाहक चकरा मारत होते. आमदार चव्हाण यांच्या कुटिल कृत्यामुळे आपण शिवसेनेच्या सभापतीपदाच्या उमेदवाराला मनात असूनही मतदान केले नाही, असा दावाही त्यांनी केला.
गेली २० वर्षे आपण भाजपच्या एकनिष्ठ कार्यकर्त्यां आहोत. केवळ खडसे समर्थक म्हणून डोंबिवलीतील भाजपच्या सर्वच कार्यकर्त्यांनी आपणास वाळीत टाकले. लोकसभा निवडणुकीच्यावेळी आपणास सेना, भाजपच्या कोणत्याही कार्यक्रमाला बोलवण्यात आले नाही. याबाबतची माहिती आपण लेखी निवेदनाद्वारे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांना देणार आहोत. पक्षादेश मिळालाच नाही. त्यामुळे तो फाडून टाकणे, न मानण्याची कृती माझ्याकडून झाली नाही, असे स्पष्ट करीत पक्ष सोडणार नसल्याचे सांगितले.
धमकी आणि शिवीगाळ केल्याचा इन्कार
दरम्यान, कोठावदे या मनसे नगरसेविकांच्या गटातून सभागृहात आल्या. त्यामुळे त्यांचे विरोधकांनी अपहरण केले हे स्पष्ट होते. आपण कोणालाही धमक्या किंवा शिवीगाळ केली नसल्याचे स्पष्ट करीत सभापतीपदासाठी युतीचा विजय होणारच होता; तो झाला, असे आमदार रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले.
संग्रहित लेख, दिनांक 30th Apr 2014 रोजी प्रकाशित
भाजप आमदारापासून धोका असल्याची कोठावदेंची तक्रार
डोंबिवलीचे भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांच्यापासून आपल्या जिवाला धोका असल्याने आपण पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे.
First published on: 30-04-2014 at 01:11 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kothawade alleged on bjp mla