भाषा अभ्यासक सुहास लिमये यांचे बुधवारी करोनामुळे सैफी रुग्णालयात निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्रकार पत्नी भारती लिमये आणि मुलगी असा परिवार आहे. सुहास लिमये संस्कृत पंडित म्हणून ओळखले जात. अमराठी भाषकांना मराठी शिकवण्याचे कामही त्यांनी केले. संस्कृत, मराठी, हिंदी, इंग्रजी या चारही भाषांचा त्यांचा गाढा अभ्यास होता.
मराठी आणि संस्कृतचा अभ्यास करू इच्छिणाऱ्या अमराठी भाषकांसाठी लिमये यांनी शीव येथील ‘तमिळ संघम्’मध्ये मराठी आणि संस्कृतचे विनामूल्य अध्यापन केले. अभिनेता आमिर खान यानेही त्यांच्याकडूनच मराठीचे धडे गिरवले. कर्क रोगावर मात करून त्यांनी पुन्हा शिकवण्यास जोमाने सुरुवात केली. साहित्याची आवड असणाऱ्या विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्तींनी ‘जिज्ञासा अभ्यास मंडळ’ स्थापन के ले. याअंतर्गत संस्कृतमधील गाजलेल्या साहित्याचा अभ्यास त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता. आतापर्यंत कालिदासाचे मेघदूत, शंकराचार्याचे भज-गोविन्दम्, रम्भा-शुक संवाद, राधा-कृष्ण संवाद, पंडितराज जगन्नाथाचे ‘गंगालहरी’ आणि कालिदासाच्या ‘रघुवंशम्’चे सहा सर्ग अभ्यासले आहेत. टाळेबंदीमुळे वर्ग बंद असल्याने ते अस्वस्थ होत. हळूहळू त्यांनी ऑनलाइन अध्यापन करण्यास सुरुवात केली होती,’ असे त्यांच्या पत्नी भारती यांनी सांगितले.
मुंबई विद्यापीठाच्या जर्मन विभागातर्फे ‘माय मराठी’ प्रकल्प राबवला जात आहे. यात युरोपीय भाषा अध्यापन पद्धतीप्रमाणे मराठी भाषेचा सहा पातळ्यांतील अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. या प्रकल्पात सुहास यांचा सुरुवातीपासून सहभाग होता. मराठी भाषेचे व्याकरण सहा पातळ्यांमध्ये विभागून कसे शिकवले जावे, याबाबतचे मार्गदर्शन त्यांनी केले. पाठय़पुस्तकांसाठी लेखन केले. एखादा उतारा लिहिला जात असताना त्याचे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय संदर्भ ते सांगत. सुहास यांच्या जाण्याने ‘माय मराठी’ प्रकल्पाचे मोठे नुकसान झाल्याची भावना प्राध्यापिका सोनाली गुजर यांनी व्यक्त केली.