मुंबई : महायुतीत जागावाटपाचा अखेपर्यंत घोळ सुरू असला तरी आतापर्यंत जाहीर झालेल्या जागावाटपात शिवसेना शिंदे गटाला १२ तर अजित पवार गटाच्या वाटयाला चार जागा आल्या आहेत. शिंदे गटाला अजून तीन जागा मिळतील अशी आशा आहे. मुंबईतील तीन जागा मिळविण्यात शिंदे यशस्वी झाले आहेत.

शिंदे गटाकडे मावळत्या लोकसभेतील १३ खासदार बरोबर आहेत. सर्व १३ जागा कायम ठेवून आणखी जागा मिळाव्यात, असा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न होता. भाजपने जागावाटपाच्या वाटाघाटींमध्ये अधिक जागा सोडण्यास नकार दिला होता. पण शिंदे यांनी दिल्लीत आपले वजन वापरून जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न केला आहे. शिंदे यांना मिळणाऱ्या वाढत्या महत्त्वामुळे राज्य भाजपमध्ये अस्वस्थता आहे.

भाजपने केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणाचा दाखला ‘प्रमाण’ मानून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विदर्भातील रामटेक, यवतमाळ आणि हिंगोली मतदारसंघातील उमेदवार बदलावे लागले होते. यामुळे शिंदे यांच्या वाटयाला १३ जागा तरी कायम राखता येतील का, अशी चर्चा सुरू झाली होती.

शिंदे गटाने आतापर्यंत १२ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. कल्याण, ठाणे, नाशिक आणि पालघरपैकी तीन तरी जागा मिळाव्यात, असा शिंदे यांचा प्रयत्न आहे. महायुतीत शिवसेनेच्या वाटयास १५ जागा मिळतील, असा दावा शिंदे गटाचे नेते करीत आहेत.

हेही वाचा >>> मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ होणार- मनोज जरांगे यांचा इशारा

या तुलनेत आठ ते नऊ जागांची मागणी करणाऱ्या अजित पवार गटाच्या फक्त चार जागा आल्या आहेत. परभणीत राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांच्यासाठी राष्ट्रवादीने जागा सोडली होती. तरीही शिंदे गटाच्या तुलनेत अजित पवार गटाला तेवढया जागा मिळालेल्या नाहीत. अजित पवार गटाला विधानसभेच्या अधिक जागा हव्या आहेत. यामुळे लोकसभेसाठी कमी जागा स्वीकारल्याचे या पक्षा्च्या नेत्यांकडून सांगण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीत जास्तीत जास्त जागा पटकावून आपले नेतृत्व सिद्ध केले आहे.

तीन जागांचा तिढा

ठाणे, नाशिक आणि पालघर या तीन जागांचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. कल्याणमध्ये डॉ. श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नसली तरी त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. ठाण्यासह तीन जागांवर चर्चा सुरू असली तरी दोन जागा मिळाव्यात असा भाजपचा प्रयत्न आहे.

नार्वेकर, लोढा यांच्या पदरी निराशा

दक्षिण मुंबई मतदारसंघ भाजपच्या ताब्यात येईल आणि आपल्याला उमेदवारी मिळेल या आशेवर असलेले विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि पालकमंत्री मंगलप्रभात लोढा या दोघांचीही निराशा झाली आहे. कारण हा मतदारसंघ शिवसेनेच्या शिंदे गटाने स्वत:च्याच ताब्यात ठेवला आहे. दक्षिण मुंबईवर भाजपचा दावा होता. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना लढण्याची तयारी करण्यास सांगण्यात आले होते. यामुळेच फेब्रुवारी महिन्यात त्यांनी मतदारसंघात भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मिलिंद देवरा यांनी लोकसभा लढण्याचे टाळले

उच्चभ्रू तसेच संमिश्र वस्ती असल्याने  दक्षिण मुंबई मतदारसंघात सर्वसमावेशक उमेदवाराचा शोध महायुतीकडून सुरू होता. शिंदे गटाने मिलिंद देवरा यांना राज्यसभेची खासदारकी दिली. पण दक्षिण मुंबईत देवरा हेच योग्य उमेदवार ठरू शकतात, असे शिंदे गटाच्या नेत्यांचे म्हणणे होते. देवरा लोकसभेत निवडून आल्यास एखाद्या नेत्याला राज्यसभेवर संधी देता आली असती. पण देवरा यांनी लोकसभा लढण्याचे टाळल्याचे सांगण्यात येते.