मुंबई : दापोली येथील साई रिसॉर्टचे बांधकाम करताना नियमांचे उल्लंघन करून शासनाची फसवणूक केल्याबद्दल भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी माजी मंत्री व ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्या विरोधात केलेली तक्रार लोकायुक्तांनी फेटाळून लावली आहे.

अनिल परब यांच्या रिसोर्टच्या विरोधात किरीट सोमय्या यांनी राज्यपालांकडे तक्रार केली होती. त्यानुसार राज्यपालांनी लोकायुक्तांना चौकशी करण्याचा आदेश दिला होता. किरीट सोमय्या यांच्या तक्रारीवर लोकायुक्तांकडे सुनावणी झाली होती. लोकायुक्तांनी दोन मुद्दय़ांवर ही तक्रार फेटाळून लावली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाराष्ट्र लोकायुक्त कायद्यातील कलम ८(१)(ब), आणि कलम १०(४)(सी) नुसार, एखाद्या प्रकरणात अनेक यंत्रणांकडे तक्रार दाखल केली गेली असल्यास लोकायुक्त कार्यालयाकडून चौकशी केली जात नाही. सोमय्या यांनी परब यांच्या विरोधात ईडीसह विविध यंत्रणांकडे तक्रार दाखल केली होती. दुसरीकडे, या वास्तूची मालकी सदानंद कदम यांची आहे. हे कदम सरकारी नोकर किंवा लोकसेवक नाहीत. महाराष्ट्र लोकायुक्त कायद्याच्या कक्षेत कदम येत नाहीत. यामुळेच सोमय्या यांनी केलेली तक्रार लोकायुक्तांनी फेटाळून लावली आहे.  तक्रार फेटाळून लावल्याने अनिल परब यांना दिलासा मिळाला आहे.