मुंबई : ‘जे घडले त्यासंबंधित चर्चा करण्यामध्ये अर्थ नाही, जे यश पदरात पडले आहे, त्याबद्दल सर्वांनी समाधानी राहायला पाहिजे, त्याप्रमाणे मी समाधानी आहे. कोणाच्याही विरुद्ध बोलण्यात मला स्वारस्य नाही. ज्याप्रकारे राष्ट्राने माझ्याकडून सेवा करून घेतली आणि न्यायालयाच्या निकालानंतर मला तशीच देशाची सेवा करता येईल, याचा जास्त आनंद आहे आणि माझ्या मातृभूमीने मला निवडले आहे, यापेक्षा दुसरे सुख नाही’, अशी भावना ले. कर्नल प्रसाद पुरोहित यांनी मालेगाव बॉम्बस्फोटाशी संबंधित खटल्याचा निकाल लागल्यानंतर न्यायालयातून बाहेर पडल्यानंतर दिली.

‘मी न्यायव्यवस्थेचे , देशाचे आणि माझ्यामागे उभे राहिलेल्या सर्वांचे खूप आभार मानतो. हे प्रकरण न्यायव्यवस्थेने नीट समजून घेतले आणि आम्हाला न्याय मिळवून दिला. या संपूर्ण लढाईत माझे कुटुंबिय, मित्र आणि सशस्त्र दल माझ्यामागे खंबीरपणे उभे राहिले. या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. आपला देश महान आहे. विकसनशील आहे. आपण सर्व देशासाठी सकारात्मकरित्या काम करू, अशी आशा व्यक्त करतो’, असेही ले. कर्नल प्रसाद पुरोहित म्हणाले.

मालेगाव येथील मशिदीजवळ २९ सप्टेंबर २००८ रोजी मोटारसायकलमध्ये ठेवण्यात आलेल्या बॉम्बचा स्फोट होऊन सहा जण ठार आणि १०० हून अधिक जखमी झाले होते. सुरुवातीला राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) या प्रकरणाचा तपास केला होता. त्यानंतर, प्रकरणाचा तपास सीबीआयकडे, नंतर एनआयएकडे वर्ग केला गेला. आता देशातील दहशतवादाशी संबंधित दीर्घकाळ चाललेल्या खटल्यांपैकी एक असलेल्या मालेगाव बॉम्बस्फोटाशी संबंधित खटल्याचा निकाल राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) कायद्याअंतर्गत स्थापन विशेष न्यायालयाने आज दिला असून साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, ले. कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह सात जणांची पुराव्याअभावी सुटका करण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.