मुंबई : तीन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम उतीर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या थेट दुसऱ्या वर्षाला प्रवेश घेता येतो. कृषी पदवीच्या थेट द्वितीय वर्षाच्या प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी सोमवारी सायंकाळी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी कक्ष) जाहीर करण्यात आली. राज्यातील चार विद्यापीठांअंतर्गत असलेल्या कृषी महाविद्यालयांमध्ये या विद्यार्थ्यांसाठी ठेवण्यात येणाऱ्या १० टक्के जागांवर हे प्रवेश दिले जातात.

महाराष्ट्रातील चार कृषी विद्यापीठांत इंग्रजी माध्यमातून पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमाच्या थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश दिला जातो. या प्रवेशासाठी प्रत्येक कृषी महाविद्यालयातील जागांच्या १० टक्के जागा या विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात येतात. त्यासाठी खुल्या प्रवर्गात किमान ६.० एकत्रित श्रेयांक सरासरी गुणासह उत्तीर्ण व आरक्षित प्रवर्गासाठी किमान ५.० एकत्रित श्रेयांक सरासरी गुणासह (सीजीपीए) उत्तीर्ण असणे आवश्यक असते. या प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी सोमवारी सायंकाळी सीईटी कक्षाकडून जाहीर करण्यात आली.

गुणवत्ता यादीत नाव जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना २४ ते २६ जून या कालावधीत प्रत्यक्षात महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायचा आहे, अशी माहिती सीईटी कक्षाचे कृषी विभागाचे परीक्षा समन्वयक डॉ. मंगेश निकम यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पहिल्या गुणवत्ता यादीतील प्रवेश पूर्ण झाल्यानंतर २७ जून रोजी रिक्त जागांचा तपशील जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीसाठी पसंतीक्रम भरता येणार आहे. दुसरी गुणवत्ता यादी ३० जून रोजी जाहीर होणार आहे. प्रवेश प्रक्रियेची अंतिम मुदत ९ जुलै असेल.