शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केलेल्या भाषणावर टीका करताना उद्धव ठाकरे यांनी त्यांचा रिक्षाचालक म्हणून उल्लेख केला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, “खूप वेगाने धावत असल्याने त्यांचे ब्रेक फेल गेले आहेत”. दरम्यान उद्धव ठाकरेंच्या टीकेला एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं असून हे सामान्य माणसाचं सरकार असल्याचं म्हटलं आहे. तसंच रिक्षाच्या वेगाना मर्सिडीजला मागे टाकलं आहे असं प्रत्युत्तरही दिलं.

काल माईक खेचला, उद्या काय खेचतील माहीत नाही ; एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे यांचा टोला

शिवसेनेच्या महिला आघाडीची बैठक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी शिवसेना भवनमध्ये घेतली. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासहित बंडखोर आमदारांवर टीका केली. एकनाथ शिंदे आधी रिक्षाचालक होते याचा उल्लेख करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “अधिवेशनातील भाषणातून हा सगळा कट (बंड) कधी आखण्यात आला होता हे स्पष्ट झालं आहे. उपमुख्यमंत्री त्यांना सतत थांबा सांगत होते. पण गाडीचे ब्रेक फेल गेले होते, ते कसे थांबणार? याआधी ते आम्हाला तीन चाकांचं महाविकास आघाडी सरकार म्हणत होते. पण आता तीन चाकी चालवणारा सरकार चालवत आहे”.

एकनाथ शिंदेंचं उत्तर –

उद्धव ठाकरेंच्या या टीकेला एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं आहे. ते ट्वीट करत म्हणाले की, “रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला. कारण हे सर्वसामान्यांचं सरकार!! “.

तसंच एएनआयशी बोलताना ते म्हणाले की, “हे सरकार सर्वसामान्यांचं असल्याने रिक्षाने मर्सिडीजला मागे टाकलं आहे. आम्ही सर्व घटकातील लोकांना न्याय देणार आहोत. प्रत्येकाला आपलं सरकार आहे असे वाटेल अशा पद्धतीने आम्ही कामगिरी करू. हाच मुख्य फरक असेल”.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“काल माईक खेचला, उद्या काय खेचतील माहीत नाही”

ज्यांच्यावर पक्षाची धुरा सोपवली होती, त्यांनीच पाठीत वार केला. हेच माझ्यासाठी लाजिरवाणे आहे, अशी खंत व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र बोलत असताना फडणवीस यांनी काल शिंदे यांचा माईक खेचला उद्या काय खेचतील माहिती नाही अशा शब्दांत भाजप आगामी काळात शिंदे यांना फसवणार असे भाकीत उद्धव ठाकरे यांनी वर्तवलं.