मुंबई : राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शिधापत्रिकारकांना अन्नधान्य व साखरेचे वाटप करणाऱ्या रास्त भाव दुकानदारांच्या कमिशनमध्ये (मार्जिन) प्रतिक्विंटल २० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या वाढीमुळे आता दुकानदारांना क्विंटलमागे १५० रुपयांऐवजी १७० रुपये अतिरिक्त मोबदला मिळणार आहे.

अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजना शिधापत्रिकाधारकांना ५३ हजार ९१० रास्तभाव दुकानदारांमार्फत ई-पॉस मशिनद्वारे बायोमेट्रिक पडताळणी करून अन्नधान्य, साखर व इतर वस्तूंचे वितरण करण्यात येते. या दुकानदारांना केंद्र सरकारकडून ४५ रुपये आणि राज्य शासनाकडून १०५ रुपये असे एकूण क्विंटलमागे १५० रुपये ‘मार्जिन’ म्हणून दिले जात होते. या मार्जिन रकमेत वाढ करण्याची विनंती या दुकानदारांच्या संघटनांकडून करण्यात येत होती. त्यानुसार वाढ करण्यात आली असून, या निर्णयामुळे दरवर्षी सुमारे ९२ कोटी ७१ लाख रुपयांची अतिरिक्त तरतूद केली जाणार आहे.