मुंबई : यावर्षी दिवाळी हंगामात राज्य परिवहन (एसटी)ला तब्बल ३०१ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले असून सर्वाधिक उत्पन्न पुणे विभागाने मिळवले आहे. त्याखालोखाल धुळे व नाशिक या विभागाचा क्रमांक आहे. चांगले उत्पन्न आणल्याबद्दल परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी या विभागातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

यावर्षी १८ ऑक्टोबर ते २७ ऑक्टोबर या दिवाळीच्या १० दिवसात एसटी महामंडळाला दररोज सरासरी ३० कोटी याप्रमाणे तब्बल ३०१ कोटी रुपये उत्पन्न मिळाले. विशेष म्हणजे दिवाळी सुट्टीच्या परतीच्या दिवशी २७ ऑक्टोबरला ३९ कोटी ७५ लाख रुपये उत्पन्न मिळवून या वर्षातील सर्वाधिक उत्पन्नाचा नवा विक्रम केला आहे. एसटीच्या ३१ विभागात सर्वाधिक उत्पन्न पुणे विभागाने आणले असून ते २० कोटी ४७ लाख रुपये आहे. त्याखालोखाल धुळे विभागाने १५ कोटी ६० लाख रुपये आणि नाशिक विभागाने १५ कोटी ४१ लाख रुपयांचा महसूल गोळा केला आहे. मागील वर्षीच्या दिवाळी हंगामापेक्षा यावर्षी महामंडळाने तब्बल ३७ कोटी रुपये उत्पन्न जास्त मिळाले आहे.

उत्पन्नाचे अपेक्षित लक्ष गाठण्यास एसटीला अपयश

यंदाच्या आर्थिक वर्षामध्ये एप्रिल आणि मे हे दोन महिने वगळता गेली चार महिने एसटी महामंडळाला सातत्याने तोटा सहन करावा लागत आहे. अवकाळी पाऊस आणि पूर परिस्थिती यामुळे जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये महामंडळाला सुमारे १५० कोटीपेक्षा जास्त तोटा सहन करावा लागला. परंतु ऑक्टोबर महिन्यात दिवाळीचा हंगाम व सुट्ट्यांच्या कालावधीमुळे उत्पन्नात वाढ होईल, अशी अपेक्षा होती. त्यामुळे प्रतिदिन ३४ कोटी रुपये याप्रमाणे ऑक्टोबर महिन्यात १,०४९ कोटी रुपयाचे उत्पन्न मिळविण्याचे लक्ष निर्धारित करण्यात आले होते.

तथापि, ऐन दिवाळीच्या काही मोजके दिवस सोडता दैनंदिन लक्ष गाठण्यात महामंडळाला शक्य झाले नाही. पुणे, बीड, अहिल्यानगर, अमरावती, बुलढाणा या विभागांनी मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या दिवाळीमध्ये चांगले उत्पन्न आणण्याचा प्रयत्न केला. परंतु सिंधुदुर्ग, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, धाराशिव यासारख्या विभागांनी मात्र अत्यंत सुमार कामगिरी केल्यामुळे महामंडळाच्या एकूण उत्पन्नावर विपरीत परिणाम झाल्याचे दिसून येते. निर्धारित केलेल्या लक्ष्यापेक्षा अत्यंत कमी उत्पन्न आणणाऱ्या विभागांच्या कामगिरीबाबत वरिष्ठ पातळीवर चिंता व्यक्त केली आहे. सातत्याने तोट्यात राहणाऱ्या विभागांचे योग्य मूल्यमापन होऊन त्यांच्या कामगिरीत सुधारणा होण्यासाठी एसटी प्रशासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.