मुंबई : विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. प्रत्यक्ष घरोघरी भेटीपासून सुरू झालेला हा प्रचार पत्रके आणि समाजमाध्यमांपर्यंत सुरू आहे. समाजमाध्यमांवर सध्या उमेदवारांचा प्रचार सुरू असून यात दिलेल्या घोषवाक्यातून प्रतिभेला अक्षरश: बहर आला आहे. यमक जुळवून स्वत:चा प्रचार करण्याबरोबरच विरोधकांचा अप्रचार करण्याची शक्कलही या घोषवाक्यात काहींनी जुळवून आणली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचा दिवस जवळ आला असून प्रचारही अंतिम टप्प्यावर आला आहे. पहिल्या टप्प्यात गृहभेटी, नंतर पदयात्रा, प्रचार रॅलीद्वारे प्रचाराला सुरुवात झाली. आता प्रचार सभा सुरू झाल्या आहेत. त्याचबरोबर सर्व उमेदवारांचा समाज माध्यमांवरूनही प्रचार सुरू आहे. समाज माध्यमांवरील प्रचारात कमीतकमी शब्दात आपला प्रचार करण्याची युक्ती सर्वच उमेदवारांनी लढवली आहे. त्यातही काही उमेदवारांच्या घोषणा, घोषवाक्ये खूप गाजत आहेत.

हेही वाचा : राज्यात बीएस्सी नर्सिंगच्या १६०० जागा रिक्त, संस्थात्मक प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर

शिवसेनेची दोन शकले झाल्यानंतर ही पहिली विधानसभा निवडणूक होत आहे. या निवडणुकीत शिवसेना (ठाकरे) पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या निष्ठावंत उमेदवारांना संधी दिली असून या निवडणुकीला निष्ठा विरुद्ध गद्दारी असा रंग दिला आहे. त्यामुळे ज्या मतदारसंघात शिवसेनेच्या दोन गटातील उमेदवारांमध्ये लढत आहे तिथे ठाकरे गटाच्या उमेदवारांनी ‘गद्दार नको…खुद्दार हवा’ या घोषवाक्याचा प्रचारासाठी वापर करण्यात ये आहे. शिवसेनेच्या पारंपरिक मतदारांना या वाक्यातून साद घातली आहे. तसेच ‘ठाकरे सरकार आणूया…’, ‘ठाकरेंचा शिलेदार निवडू या’ ही घोषणाही बघायला मिळत आहे. शिवडीमध्ये शिवसेनेचे (ठाकरे) उमेदवार अजय चौधरी यांच्या प्रचारात ‘अजय शिवडीचा, विजय शिवसेनेचा’ ही घोषणा लक्षवेधी ठरत आहे.

अनेक आमदारांची ही निवडणूक लढवण्याची दुसरी किंवा तिसरी वेळ आहे. त्यांच्या प्रचारात तसा उल्लेख आढळतो. अंधेरीतील भाजपचे उमेदवार अमित साटम यांच्या प्रचारात ‘अंधेरी कहे दिलसे…अमित साटम फिरसे’ हे घोषवाक्य लक्षवेधी ठरत आहे. तर घाटकोपरचे भाजपचे उमेदवार पराग शाह यांच्या प्रचारातील घोषवाक्य ‘घाटकोपर की यही स्पिरिट… पराग शाह फिरसे रिपीट’ हे देखील लक्षवेधी ठरत आहे.

हेही वाचा : Maharashtra Rain News: दक्षिण महाराष्ट्राला बिगर मोसमी पावसाचा फटका, आणखी दोन दिवस पावसाचा जोर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ज्या मतदारसंघात एकाच कुटुंबाकडे अनेक वर्षे उमेदवारी आहेत त्या मतदारसंघात ‘परिवर्तन हवे परिवारवाद नको’ अशीही घोषणा ऐकायला, वाचायला मिळत आहे. तर काही ठिकाणी ‘तारीख वीस, आमदार फिक्स’ अशी घोषणा कानावर पडत आहे. अनेक मतदारसंघात उमेदवारांनी नावापुढे ‘आपला’ हा शब्द जोडून मतदारांशी आपुलकी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. ‘आपली शिवडी, आपला बाळा’ ही घोषणा गेले कित्येक महिने शिवडीत गाजत आहे. बोरिवलीत शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार प्रकाश सुर्वे यांच्या प्रचारात ‘एकच वादा…..प्रकाश दादा’ ही घोषणा ऐकायला मिळत आहे. तर भायखळ्यात शिवसेना (शिंदे) पक्षाच्या उमेदवार यामिनी जाधव यांच्या प्रचारात ‘कामगिरी दमदार …यामिनी आमदार’ अशी घोषणा वाचायला मिळत आहे.