प्रमोद महाजन, गडकरी, मुंडेंनंतर राज्यातील व्यक्तीला भाजप संघटनेत महत्त्वाची जबाबदारी
मुंबई : विधानसभेसाठी उमेदवारी नाकारलेल्या विनोद तावडे यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. उमेदवारी नाकारली तरी संयम दाखविल्याने चांगले फळ कसे मिळते, याचे हे उदाहरण आहे, अशी प्रतिक्रिया तावडे यांनी व्यक्त केली आहे.
भाजपचे अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करताना तावडे यांच्यावर राष्ट्रीय सरचिटणीस या महत्त्वाच्या पदाची जबाबदारी सोपविली आहे. ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांच्यानंतर भाजप सरचिटणीसपदी नियुक्ती झालेले तावडे हे महाराष्ट्रातील पहिलेच नेते आहेत. नितीन गडकरी हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते, तर ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि लोकसभेतील उपनेतेपदाची जबाबदारी सांभाळली होती.
देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये पाच वष्रे विविध खात्यांची मंत्रिपदे भूषविलेल्या तावडे यांना २०१९च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने उमेदवारी नाकारली होती. पक्षाने गेल्या वर्षी त्यांची पक्षाच्या राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती केली होती. आता त्यांना सरचिटणीसपदी बढती देऊन पक्षाने त्यांचा सन्मानच केला आहे.
राष्ट्रीय चिटणीस म्हणून तावडे यांच्याकडे हरयाणा राज्याचे प्रभारी तसेच प्रधानमंत्री कार्यालयातील मन की बात व विविध केंद्र सरकारच्या योजनांची जबाबदारीही दिली होती.
राज्यात भाजपला २०१४ मध्ये सत्ता मिळाली तेव्हा मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे या नेत्यांची नावे चच्रेत होती. पुढे नेतृत्वामध्येच दरी निर्माण झाली. फडणवीस यांच्याशी न पटल्याने खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. तावडे व पंकजा मुंडे हे आता राष्ट्रीय राजकारणात असून पंकजा मुंडे सचिवपदी आहेत.
अभाविपचे काम
विनोद तावडे यांनी १९८० ते ९५ या कालावधीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम केले. त्यापकी दहा वष्रे ते अभाविपचे पूर्णवेळ प्रचारक होते. ९५ पासून भाजपमध्ये सक्रिय झाल्यावर महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस, मुंबई अध्यक्ष, विधान परिषदेचे १३ वष्रे सदस्य, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अशा विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या. तावडे यांनी २०१४ ला बोरिवली मतदारसंघातून विजय मिळवला होता. सरकारमध्ये शिक्षण, युवक कल्याण व क्रीडा, उच्च व तंत्रशिक्षण, मराठी भाषा, सांस्कृतिक, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक विभाग, संसदीय कार्य अशा विविध विभागांचे मंत्रिपद सांभाळले.
नड्डा यांनी काही संघटनात्मक नियुक्त्या केल्या आहेत. बिहारचे ऋतुराज सिन्हा व झारखंड येथील आशा लाकडा यांची राष्ट्रीय सचिव म्हणून नियुक्ती केली आहे. पश्चिम बंगालमधील भारती घोष आणि शहजाद पूनावाला यांची राष्ट्रीय प्रवक्ता म्हणून नियुक्ती केल्याची घोषणा सरचिटणीस अरुण सिंह यांनी केली आहे.
पक्षाने उमेदवारी नाकारल्यावर नेत्यांकडून संयम पाळला जात नाही. मला उमेदवारी नाकारल्यावर मी म्हटले होते की, मला भाजपचा प्रदेश सरचिटणीस केले होते, तेव्हा बरे वाटले होते. विधान परिषदेवर निवडून आलो आणि विरोधी पक्षनेतेपदही मिळाले. मंत्री झाल्यावर आठ खाती एकटा सांभाळत होतो, ज्यासाठी या सरकारमध्ये आठ मंत्री आहेत; पण ही जबाबदारी सांभाळताना खूप चांगले वाटत होते. त्यामुळे एखादे वेळी तिकीट मिळाले नाही, तर मी आता पक्ष सोडतो, वगरे म्हणणे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या स्वभावात नाही. मी संयम दाखविला. जे काम दिले जाईल ते प्रामाणिकपणे करायचे. मग तुमची दखल नक्की घेतली जाते. हे मात्र आजच्या माझ्या उदाहरणावरून कार्यकर्त्यांना अधिक स्पष्ट झाले असेल. – विनोद तावडे, राष्ट्रीय सरचिटणीस