मुंबई : लोकसभेच्या राज्यातील ३१ ते ३२ जागा लढविण्यावर भाजप ठाम असून शिवसेनेला (शिंदे गट) १२ ते १३ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला चार जागा देण्याच्या प्रस्तावावर महायुतीमध्ये विचारविनिमय सुरु आहे. जागावाटप येत्या तीन-चार दिवसांत अंतिम होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे भाजपदेखील उमेदवार निवडीमध्ये मुंबईसह राज्यात धक्कातंत्र वापरण्याची शक्यता असून अनेक विद्यामान खासदारांचे तिकीट कापले जाऊ शकेल.

मोदींच्या हस्ते हजारो कोटींच्या रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर चर्चेच्या तीन-चार फेऱ्या झाल्या आहेत. शिंदे २०१९ मध्ये शिवसेनेने जिंकलेल्या १८ जागांवर दावा केला असला तरी शिंदेंबरोबर असलेल्या १३ खासदारांच्या जागा देण्यासही भाजप तयार नाही. त्यामुळे शिंदे गटाला आपला आग्रह सोडून द्यावा लागला आहे. कीर्तीकर शिंदेंबरोबर असले, तरी त्यांचे पुत्र अमोल ठाकरे गटाकडून रिंगणात उतरणार आहे. त्यामुळे ही जागा भाजपसाठी सोडावी व कीर्तीकर यांना विधानपरिषदेवर पाठवावे, असा प्रस्ताव देण्यात आला आहे. तेथे आमदार अमित साटम यांना उमेदवारी मिळू शकेल. याखेरीज भाजप काही विद्यामान खासदारांना तिकिट नाकारण्याची शक्यता आहे. दोन वेळा खासदार झालेल्या प्रीतम मुंडे यांच्याऐवजी त्यांच्या भगिनी व ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे यांना बीडमधून उमेदवारी देण्याबाबत विचार सुरु आहे. छत्रपती संभाजीनगरमधून केंद्रीय मंत्री भागवत कराड मैदानात उतरू शकतात. मुंबईतील तीनही विद्यामान खासदारांना डच्चू मिळू शकतो. उत्तरमध्य मुंबईत पूनम महाजन यांचे मताधिक्य २०१९ मध्ये ५० हजारांनी घटले होते. तेथील मुस्लिम-ख्रिाश्चनांचे प्रमाण, ठाकरे गटाचे प्राबल्य व कार्यकर्त्यांमध्ये असलेली नाराजी, यामुळे महाजन यांच्याऐवजी तेथे मुंबई अध्यक्ष अॅड. आशिष शेलार यांना उमेदवारी मिळू शकेल. ईशान्य मुंबईतून मनोज कोटक यांच्याजागी आमदार पराग शहा यांची वर्णी लागू शकते. दक्षिण मुंबईतून विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांच्या नावाची चर्चा आहे. मुंबईत भाजप पाच जागा लढवेल व ठाण्याची जागा शिंदे गटाला देण्यात येईल, असा प्रस्ताव आहे.