संदीप आचार्य,लोकसत्ता

मुंबई – यंदाच्या पावसाळ्यात पाय आणि घोट्यासंबंधीत वेदनेच्या घटनांमध्ये चाळीच टक्के वाढ झाल्याची नोंद डॉक्टरांनी केली आहे. घोट्याला दुखापत होण्यास कारणीभूत घटकांपैकी निसरडा पृष्ठभाग, खड्डे, खराब रस्ते आणि चुकीच्या पादत्राणांचा वापर तसेच मोटरबाईक अपघातांचा समावेश आहे. पावसाळ्यात रस्त्यावरील खड्ड्यात पाय मुरगळण्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. दररोज रूग्णालयातील बाह्यरूग्ण विभागात पायाच्या घोट्याला दुखापत आणि फ्रॅक्चर झालेले १० ते१२ रूग्ण उपचारासाठी येत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

जीटी रूग्णालयातील अस्थिव्यंग विभागाचे प्रमुख सहयोगी प्राध्यापक डॉ. धीरज सोनावणे म्हणाले की, पावसाळ्यात चिखलात किंवा साचलेल्या पाण्यात पाय घसरून पडल्याने किंवा खड्ड्यातून गाडी चालवताना अनेक अपघात होतात. दररोज साधारणतः बाह्यरूग्ण विभागात १० ते १२ रूग्ण पायाला दुखापत होणे, कंबरेत फ्रॅक्चर, मणक्याची गादी (डिस्क) बाहेर येणं, लिंगामेंटला दुखापत झाल्याची तक्रार घेऊन उपचारासाठी येत आहेत. अशा रूग्णांवर तातडीने उपचार सुरू करावे लागतात. पायाला किंवा कंबरेत फ्रॅक्चर असल्याने ते ठिक व्हायला तीन आठवडे लागतात. त्यानंतर अशा रूग्णांना फिजिओथेरपीचा सल्ला दिला जातो. अशा स्थितीत वेळीच उपचार करणं खूप गरजेचं असते. अन्यथा दुखापत वाढू शकते. त्यामुळे पावसाळ्यात रस्त्यावरून चालताना काळजी घेणं गरजेचं आहे.

प्रामुख्याने एसटी वा तत्सम वाहानांमधून प्रवास करणाऱ्या वृद्ध मंडळींना पावसाळ्यातील खराब रस्ते व खड्ड्यांचा मोठा त्रास होतो असे ठाणे जिल्हा रुग्णालयातील ज्येष्ठ अस्थिव्यंग तज्ज्ञ डॉ. विलास साळवे यांनी सांगितले. ऑस्टिओफोरासिसचा त्रास असलेल्या लोकांना याचा मोठा फटका बसतो. कंबरेत फ्रॅक्चर वा मणक्याची गादीचा त्रास याचे रुग्ण पावसाळ्यात जास्त प्रमाणात पाहायला मिळतात असेही डॉ साळवे म्हणाले.

झायनोव्हा शाल्बी रूग्णालयातील अस्थिशल्यचिकित्सक डॉ. धनजंय परब म्हणाल की, पाय घसरल्याने किंवा पडल्याने घोट्याला दुखापत झाल्याचे २ ते ३ रूग्ण उपचारासाठी येतात. परंतु, सध्या पावसाळ्यात पायाचे हाड मोडलेले सात आठ रुग्ण रोज रूग्णालयातील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये उपचारासाठी येत आहेत. घोट्याच्या दुखापती,सौम्य अस्थिबंधनाला झालेली दुखापक, अस्थिबंधन फाटणे किंवा फ्रॅक्चर अशा तक्रारी पहायला मिळतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रामुख्याने पावसाळ्यात घोट्याला दुखापत होणार नाही याची काळजी घ्या. निसरड्या पृष्ठभागावर चालताना विशेष काळजी घ्या, चांगल्या पादत्राणांचा वापर करा. उंच टाच आणि पृष्ठभाग गुळगुळीत असलेली चप्पल वापरणे टाळा. ओल्या किंवा असमान पृष्ठभागावर चालताना सावधगिरी बाळगा. डबके, चिखल आणि इतर अडथळ्यांकडे लक्ष द्या ज्यामुळे तुम्ही घसरू शकता किंवा तोल गमावू शकता असे अपोलो स्पेक्ट्रा मुंबईचे फुट ॲण्ड एंकल सर्जन डॉ. ध्रुमीन संगोई म्हणाले.