लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मलनि:सारण वाहिनीसाठी खोदलेल्या खड्यात पडून एका ५२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी चेंबूरच्या टिळक नगर परिसरात घडली आहे. याबाबत टिळक नगर पोलिसांनी संबंधित पालिकेच्या कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

चेंबूरच्या टिळक नगर परिसरातील इमारत क्रमांक ४३ येथे गेल्या काही दिवसांपासून पालिकेकडून मलनि:सारण वाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी २५ फूट खोल खड्डा खोदण्यात आला आहे. मात्र या खड्ड्याच्या बाजूला कुठल्याही प्रकारे सुरक्षेची दक्षता घेण्यात आली नव्हती. परिसरात राहणारे राजू दवंडे (५२) हे तेथून जात असताना त्यांचा पाय घसरून ते २५ फूट खोल खड्ड्यात पडले. काही स्थानिकांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तत्काळ टिळक नगर पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांना घटनेची माहिती दिली.

आणखी वाचा-कुर्ला बस अपघात: मृत महिलेचे दागिने चोरणाऱ्याविरोधात अखेर गुन्हा दाखल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही वेळातच घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना बाहेर काढून घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. पालिकेच्या निष्काळजीपणामुळे हा मृत्यू झाल्याने परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. याबाबत टिळक नगर पोलिसांनी घटनेची नोंद करून झेड कन्स्ट्रक्शन या कंत्राटदार कंपनीच्या सुपरवायझरवर गुन्हा दाखल केला असून याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.