धवल कुलकर्णी

साधारणपणे ९०० हेक्टर चा परिसर आणि त्यावर लक्ष ठेवायला फक्त सहाच्या आसपास कर्मचारी… ही कहाणी आहे महाराष्ट्र वनविभागाच्या कांदळवन सेलची. घाटकोपर पासून ते कुलाबा पर्यंत प्रचंड मोठा विस्तार असलेल्या सेंट्रल मुंबई रेंज कडे आपल्याकडे असलेल्या कांदळवन यांच्या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी एक वनक्षेत्रपाल, दोन वनपाल आणि चार वनरक्षक आहेत.

या परिसरात धारावी आणि वडाळा सारखे कांदळवन असलेले विभाग येतात त्यामुळे आम्हाला इथे होणाऱ्या अतिक्रमणांवर लक्ष ठेवावे लागते व तसेच कांदळवनांच्या परिसरात राडारोडा इत्यादी ते डंपिंग होऊ नये हेही पहावे लागते. मात्र हे सगळं करण्यासाठी आमच्याकडे पुरेसे कर्मचारी नाहीत अशी खंत एका वनखात्याच्या ज्येष्ठ अधिकाऱ्याने बोलून दाखवली. एकदा काढण्यात आलेली अतिक्रमण पुन्हा येऊ नये यासाठी वनखात्याने साधारणपणे ४३ कर्मचारी हे महाराष्ट्र राज्य सिक्युरिटी फोर्स यांच्याकडून घेतले आहेत. हे सुरक्षा कर्मचारी नियमितपणे त्या या विभागांमध्ये गस्त घालतात. याचा परिणाम असा की चिता कॅम्प सारख्या झोपडी बहुल विभागांमध्ये काढण्यात आलेली अतिक्रमण पुन्हा उभे राहून कांदळवन त्यांच्या मुळावर उठले नाही.

कांदळवन आणि खाडीच्या परिसरात अतिक्रमण होऊ न देणे याच बरोबर सीगल प्रमाणे परदेशातून स्थलांतर करून येणारे पक्षी यांना लोकांनी शेव चिवडा आणि फरसाण खाऊ घालू नये आणि कधीकधी किनारपट्टीवर सापडणारे डॉल्फिन आणि इतर जलचर प्राणी यांची विल्हेवाट लावणे याची सुद्धा जवाबदारी वन कर्मचाऱ्यांना घ्यावी लागते. यामुळे मुंबईची फुफ्फुसं असणाऱ्या कांदळवनांची निगा राखायची असेल तर वनखात्याकडे अधिक अधिकारी आणि कर्मचारी द्यावे लागतील हे निश्चित.