मुंबई : ‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ – आरे मेट्रो ३’ मार्गिकेवरील बीकेसी – आचार्य अत्रे चौक दरम्यानचा ‘टप्पा २ अ’ वाहतूक सेवेत दाखल झाल्यानंतर मेट्रो ३ मार्गिकवरील प्रवासी संख्या बऱ्यापैकी वाढेल, असा मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनला (एमएमआरसी) विश्वास होता. मात्र दुसरा टप्पा वाहतूक सेवेत दाखल होऊन एक महिना पूर्ण झाला तरी दैनंदिन प्रवासी संख्येत म्हणावी तशी वाढ झालेली नाही. दैनंदिन प्रवासी संख्या ५० हजाराच्या आसपास आहे. प्रवाशांचा प्रतिसाद समाधानकारक नसून प्रवासी संख्या वाढविण्यासाठी आता एमएमआरसीवर थेट खासगी संस्थेची नियुक्ती करण्याची वेळ आली आहे. प्रवासी संख्या वाढविण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, कोणते पर्याय स्वीकारता येतील याचा अभ्यास करण्यासाठी खासगी संस्थेची नियुक्ती करण्यासाठी एमएमआरसीने निविदा मागविल्या आहेत.
एमएमआरसी ३३.५ किमी लांबीच्या मेट्रो ३ मार्गिकेचे काम करीत आहे. यातील आरे – बीकेसी टप्पा ऑक्टोबर २०२४ मध्ये वाहतूक सेवेत दाखल झाला आहे. तर महिन्याभरापूर्वी, १० मे रोजी बीकेसी – आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक दरम्यानचा ‘टप्पा २ अ’ वाहतूक सेवेत दाखल झाला आहे. आरे – बीकेसी टप्पा वाहतूक सेवेत दाखल करताना या मार्गिकेवरून अंदाजे चार लाख प्रवासी प्रवास करतील अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र या टप्प्याला प्रवाशांचा प्रतिसादच मिळालेला नाही. त्यामुळेच या मार्गिकेवरून दिवसाला जेमतेम २० हजार प्रवासी प्रवास करीत होते. या मार्गिकेतील बीकेसी – आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक असा दुसरा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्यानंतर प्रवाशांचा प्रतिसाद वाढेल अशी अपेक्षा एमएमआरसीला होती. त्यानुसार प्रवासी संख्येत काहीशी वाढ झाली आहे. मात्र ही वाढ मोठी, समाधानकारक नाही. टप्पा २ वाहतूक सेवेत दाखल होऊन आता एक महिना पूर्ण झाला तरी दैनंदिन प्रवासी संख्या ५० हजाराच्या घरातच आहे. चार लाख प्रवासी संख्येचे लक्ष्य असताना दैनंदिन प्रवासी संख्या ५० हजाराच्या पुढे जात नसल्याने एमएमआरसीची चिंता वाढली आहे. त्यामुळे आता प्रवासी संख्या वाढविण्यासाठी एमएमआरसीने थेट खासगी संस्थेची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे.
मेट्रो ३ मार्गिकेकडे प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील, प्रवासी संख्या वाढविण्यासाठी कोणते पर्याय उपयुक्त ठरतील यासह अन्य काही बाबींचा अभ्यास करण्याकरीत खासगी संस्थेची नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी एमएमआरसीने नुकत्याच इच्छुक कंपन्यांकडून निविदा मागविल्या आहेत. पात्र संस्थेची नियुक्ती झाल्यानंतर सहा महिन्यांमध्ये संस्थेला अभ्यास पूर्ण करून त्यासंबंधीचा अहवाल एमएमआरसीला सादर करावा लागणार आहे. या अहवालानुसार एमएमआरसीकडून विविध उपाययोजना आणि पर्यायांची अंमलबजावणी केली जाणार आहे. या प्रयत्नानंतर तरी मेट्रो ३ मार्गिकेवरील प्रवासी संख्येत वाढ होते का हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.