मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या २२६४ (११७ भूखंडांसह) घरांसाठी बुधवारी सोडत काढली जाणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात दुपारी १ वाजता सोडतीचा कार्यक्रम होणार आहे.

या सोडतीत २४ हजार ९११ पात्र अर्जदार सहभागी होणार असले, तरी त्यातील ९० टक्क्यांहून अधिक अर्थात २३ हजार ५७४ अर्जदार हे २० टक्के योजनेतील ५९४ घरांच्या सोडतीत सहभागी होणार आहेत. २० टक्क्यांतील घरांना अर्जदारांनी सर्वाधिक पसंती देतानाच म्हाडा गृहनिर्माण आणि १५ टक्के एकात्मिक योजनेतील घरांना नापसंती दिली आहे. त्यामुळे या योजनेतील ७१३ घरांसाठी अर्जच आलेले नाहीत. शून्य प्रतिसादामुळे ती घरे रिक्त राहणार असून रिक्त घरांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

कोकण मंडळाकडून २२६४ घरांसाठी ११ ऑक्टोबरपासून अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मूळ वेळापत्रकानुसार ही प्रक्रिया १० डिसेंबरपर्यंत होणार होती, तर सोडत २७ डिसेंबरला काढण्यात येणार होती. मात्र विहित मुदतीत घरांना प्रतिसाद न मिळाल्याने सोडतीला दोनदा मुदतवाढ देण्यात आली. परिणामी सोडतीची तारीख दोनदा पुढे ढकलण्यात आली होती. मात्र, अखेर ५ फेब्रुवारीला सोडत काढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार बुधवारी ठाण्यात सोडत काढली जाणार आहे. या सोडतीकडे अर्जदारांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, बुधवारची सोडत नेमकी किती घरांसाठी असेल याबाबत कोकण मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे विचारणा करण्यात आली. मात्र, त्यांच्याकडून कोणतीही माहिती देण्यास नकार देण्यात आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोणत्या घरांसाठी किती अर्ज कोकण मंडळाच्या २२६४ घरांसाठी एकूण २४ हजार ९११ पात्र अर्ज सादर झाले आहेत. १५ टक्के योजनेतील ८२५ घरांसाठी केवळ ४१७ अर्ज दाखल झाले असून ४०८ घरांना प्रतिसाद मिळालेला नाही. म्हाडा गृहनिर्माण योजनेतील ७२८ घरांसाठी केवळ ४३४ अर्ज दाखल झाले असून ३०५ घरांना शून्य प्रतिसाद मिळाला आहे. दरम्यान, २२६४ घरांच्या सोडतीतील ११७ भूखंडांसाठी १४७ अर्ज सादर झाले आहेत.