मुंबई : दरवर्षीप्रमाणे यंदा म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाने केलेल्या सर्वेक्षणात दक्षिण मुंबईतील ९६ उपकरप्राप्त इमारती धोकादायक स्थितीत असल्याचे निदर्शनास आले. पावसाळापूर्व सर्वेक्षण सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच एका वेळी इतक्या मोठ्या संख्येने इमारती अतिधोकादायक स्थितीत आढळल्या असून यामुळे सरकारी यंत्रणा चिंतीत झाल्या आहेत. आता या अतिधोकादायक इमारतीमधील अंदाजे २,५७७ रहिवाशांना बाहेर काढून त्यांना संक्रमण शिबिरात स्थलांतरित करण्याचे मोठे आव्हान दुरुस्ती मंडळासमोर आहे.

दक्षिण मुंबईतील अंदाजे १४ हजार उपकरप्राप्त इमारतींच्या देखभाल, दुरुस्तीची जबाबदारी दुरुस्ती मंडळावर आहे. जुन्या, मोडकळीस आलेल्या या इमारती पडण्याची आणि त्यात जीवितहानी होण्याची सर्वाधिक शक्यता पावसाळ्यात असते. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी काही महिने आधी दुरुस्ती मंडळाकडून १४ हजार इमारतींच्या सर्वेक्षणाला सुरुवात केली जाते. सर्वेक्षण पूर्ण करून मेमध्ये अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर केली जाते. त्यानंतर अशा इमारतींमधील रहिवाशांना नोटीसा बजावून पावसाळा सुरू होण्याआधी, जूनच्या पहिल्या आठवड्यात इमारती रिकाम्या करून घेतल्या जातात. जे रहिवाशी घरे रिकामे करीत नाहीत, त्यांना पोलीस बळाचा वापर करून घराबाहेर काढले जाते. या प्रक्रियेनुसार यंदाचे पावसाळापूर्व सर्वेक्षण नुकतेच पूर्ण झाल्याची माहिती दुरुस्ती मंडळातील सूत्रांनी दिली. या सर्वेक्षणात तब्बल ९६ इमारती धोकादायक आढळल्याचेही सूत्रांनी सांगितले.

गेल्या वर्षी (२०२४) २० इमारती अतिधोकादायक आढळल्या होत्या. तर २०२३ मध्ये अतिधोकायक इमारतींच्या यादीत १५ इमारतींचा समावेश होता. तर २०२१ मध्ये २१ इमारती अतिधोकादायक आढळल्या होत्या. मागील काही वर्षांचा विचार करता कधीही अतिधोकादायक इमारतींची संख्या ९० च्या पार गेली नव्हती. पण यंदा मात्र अतिधोकादायक इमारतींच्या संख्येने नव्वदी पार केली आहे. यावेळी ९६ इमारती अतिधोकादायक आढळल्या असून यात २,५७७ निवासी आणि ५८५ अनिवासी रहिवाशी राहत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अतिधोकादायक इमारतीतील अंदाजे २,५७७ रहिवाशांना बाहेर काढण्याचे आव्हान दुरुस्ती मंडळासमोर आहे. आजघडीला दुरुस्ती मंडळाच्या संक्रमण शिबिरात पुरेसे गाळे नसल्याने या रहिवाशांच्या स्थलांतराचे मोठे आव्हान दुरुस्ती मंडळासमोर आहे. इतक्या मोठ्या संख्येने अतिधोकादायक इमारती आढळत असल्याने ही चिंतेची बाब आहे. दरम्यान, पावसाळापूर्व सर्वेक्षणानुसार ९६ इमारती अतिधोकादायक ठरल्या आहेतच, पण दुसरीकडे दुरुस्ती मंडळाकडून १४ हजार इमारतींच्या संरचनात्मक तपासणीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आतापर्यंत ६६६ इमारतींची तपासणी करण्यात आली असून यापैकी ५४० इमारतींच्या सर्वेक्षण अहवालानुसार ९५ इमारती अतिधोकादायक घोषित झाल्या आहेत. या ९५ इमारतींना ‘७९ अ’ची नोटीसा बजावण्यात आली असून या इमारतीही रिकाम्या करण्याचे आव्हान दुरुस्ती मंडळासमोर आहे. संरचनात्मक तपासणीअंतर्गत अतिधोकादायक ठरलेल्या ९५ आणि पावसाळापूर्व सर्वेक्षणाअंतर्गत अतिधोकादायक ठरलेल्या ९६ इमारती अशा एकूण १९१ इमारती रिकाम्या करून त्यातील रहिवाशांना संक्रमण शिबिराचे गाळे उपलब्ध करून देण्याचे मोठे आव्हान दुरुस्ती मंडळासमोर आहे.