मुंबई : देशातील सर्वात मोठ्या अटलबिहारी वाजपेयी शिवडी – न्हावाशेवा सागरी सेतूवरून अतिजलद प्रवास करणाऱ्या प्रवासी  – वाहनचालकांना आता खानपानासह इंधनाची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. अटल सेतूच्या शेवटच्या टोकाला असलेल्या जासई येथे फूड प्लाझा आणि पेट्रोल पंपची सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) घेतला आहे. त्यादृष्टीने प्रक्रिया सुरू असून येत्या काही महिन्यात ही सुविधा कार्यान्वित होणार आहे.

हेही वाचा >>> पोलिसाला रिक्षासोबत फरफटत नेले; रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबई – नवी मुंबई अंतर केवळ १२ मिनिटात पार करता यावे यासाठी एमएमआरडीएने २१.८० किमी लांबीचा सागरी सेतू बांधला. हा सेतू जानेवारी २०२४ पासून वाहतूक सेवेत दाखल झाला. या सेतूवरून दिवसाला सरासरी २२ हजार ५०० वाहने धावतात. या सागरी सेतूमुळे प्रवास अतिजलद झाला आहे. मात्र सागरी सेतूवरुन प्रवास करताना वाहनचालक-प्रवाशांसाठी खानपानाची वा इंधनाची सुविधा उपलब्ध नाही. ही बाब लक्षात घेता आता एमएमआरडीएने अटल सेतूवर फूड प्लाझा आणि पेट्रोल पंप विकसित करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती एमएमआरडीएतील अधिकाऱ्यांनी दिली. अटल सेतूच्या नवी मुंबईच्या दिशेच्या असलेल्या जासई येथे फूड प्लाझा आणि पेट्रोल पंप बांधण्यात येणार आहे. या दोन्ही सुविधा खासगी कंपनीच्या माध्यमातून विकसित केल्या जाणार आहे. त्यानुसार ऑक्टोबर २०२४ पासून यासाठीच्या प्रक्रिया सुरू आहे. यासाठी एका खासगी कंपनीबरोबर चर्चा सुरू असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. अटल सेतूच्या दोन्ही बाजूच्या मार्गिकांवर जासई येथे फूड प्लाझा आणि पेट्रोल पंप असणार आहे. या सुविधा उपलब्ध झाल्यास वाहनचालक-प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.