मुंबई : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी शुक्रवारीही वाटचाल केलेली नाही. मागील दोन दिवसांपासून मोसमी वारे एकाच जागेवर रेंगाळले आहेत. दरम्यान, पुढील काही दिवस संपूर्ण राज्यात पावसाचा जोर कमी राहणार आहे. काही भागात हलक्या ते मध्यम सरी बरसतील. मात्र, मुसळधार पावसाची शक्यता नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

नैऋत्य मोसमी वाऱ्यांची सीमा शुक्रवारी देखील मुंबई, अहिल्यानगर, आदीलाबाद, भवानीपटना, पुरी आणि बालूरघाट भागात होती. मोसमी वारे पुढील दोन दिवसांत पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या काही भागात वाटचाल करतील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, राज्यात गुरुवारपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. काही भागात हलक्या सरी बरसल्या, तर काही भागात पावसाने उघडीप दिली होती. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही पावसाचा जोर ओसरला आहे.

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजनुसार, जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मोसमी पावसाच्या प्रगतीसाठी पोषक स्थिती नाही. यामुळे पावसाचे प्रमाण कमी राहील. मात्र १२ जूननंतर संपूर्ण राज्यात पाऊस सक्रिय होईल. जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात चांगल्या पावसाची अपेक्षा आहे.

विदर्भात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पुढील पाच दिवस हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज आहे. कोकणातही पावसाचा जोर कमी राहणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उकाड्यात वाढ

पावसाने विश्रांती घेतल्यामुळे उकाड्यात वाढ झाली आहे. मागील काही दिवस पावसाळी वातावरण आणि पावसाच्या सरींमुळे दिलासा मिळाला होता. मात्र, आता पुन्हा उकाडा सहन करावा लागत आहे. तापमानात अधूनमधून चढ – उतार होत आहे. रात्रीचे तापमानही अधिक असल्याने हीच स्थिती आहे. राज्यात शुक्रवारी सर्वाधिक तापमानाची नोंद जळगाव येथे झाली. तेथे ३८.२ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले.