मुंबई : ‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ – आरे मेट्रो ३’ मार्गिकेवरील आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकात पाणी शिरल्याने मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनला (एमएमआरसी) मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर पाणी गळती वा स्थानकात पाणी शिरण्यासारखे प्रकार होऊ नये यासाठी एमएमआरसीकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र त्यानंतरही मेट्रो स्थानकावर गळती सुरू आहे.
बीकेसी मेट्रो स्थानकाच्या छतावरून मंगळवारी मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याचा दावा आता खासदार वर्षा गायकवाड यांनी केला आहे. मोठी गळती होत असल्याने एमएमआरसीकडून गळती होणारा भाग बंद करण्यात आला होता. वर्षा गायकवाड यांनी समाजमाध्यमांवर यासंबंधीची एक पोस्ट टाकली असून या गळतीवरून त्यांनी एमएमआरसी आणि राज्य सरकारवर टीका केली आहे. काम निकृष्ट असल्याचा आरोप करत भ्रष्ट अधिकारी आणि कंत्राटदारांवर कारवाईची मागणीही त्यांनी केली आहे. तर सरकार नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.