मुंबई : मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनने (एमएमआरसी) मोठा गाजावाजा करीत नुकताच ‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ – आरे भुयारी मेट्रो ३’ मार्गिकेतील बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक टप्पा २ अ वाहतूक सेवेत दाखल केला. मात्र हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल होऊन काही दिवस होत नाही तोच आचार्य अत्रे चौक मार्ग मेट्रो स्थानकात पाणी शिरल्याने ‘मेट्रो ३’च्या बांधकामाच्या दर्जावर प्रश्न उपस्थित करण्यात आले. या मार्गिकेतील बीकेसी आणि वरळी मेट्रो स्थानकात गळती सुरूच आहे. समाज माध्यमांवर गळतीची छायाचित्रे, चित्रफिती पोस्ट करून ‘मेट्रो ३’च्या बांधकामावर प्रवासी टीका करीत आहेत. एमएमआरसीने मात्र बांधकाम निकृष्ट असल्याचे आरोप फोटळून लावत किरकोळ समस्या उद््भवल्याचा दावा केला आहे. तसेच आवश्यक ती दुरुस्ती सुरू असल्याचे स्पष्ट केले.

एमएमआरसीच्या माध्यमातून ३३.५ किमीच्या भुयारी ‘मेट्रो ३’ मार्गिकेचे काम सुरू आहे. या मार्गिकेतील आरे – बीकेसी टप्पा १ ऑक्टोबर २०२४ मध्ये, तर बीकेसी – आचार्य अत्रे चौक मार्ग टप्पा २ अ १० मे २०२५ रोजी वाहतूक सेवेत दाखल झाला. टप्पा २ अ वाहतूक सेवेत दाखल झाल्यानंतर अवघ्या काही दिवसातच आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकात प्रचंड पाणी शिरले. त्यामुळे हे स्थानक बंद करण्याची नामुष्की एमएमआरसीवर ओढवली. आवश्यक ती दुरुस्ती केल्यानंतर काही दिवसांनी हे स्थानक पुन्हा वाहतूक सेवेत दाखल करण्यात आले. मात्र या घटनेमुळे ‘मेट्रो ३’च्या कामावर प्रश्न उपस्थित गेले केले. आता अजूनही ‘मेट्रो ३’ मार्गिकेतील काही स्थानकांवर मोठी गळती सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी मंगळवारी बीकेसी मेट्रो स्थानकातील गळतीसंबंधीची एक पोस्ट करत एमएमआरसी आणि राज्य सरकारवर टीका केली. काम निकृष्ट असल्याचा आरोपी करीत अधिकारी आणि कंत्राटदारांविरोधात कारवाईची मागणी केली.

राजकीय पक्षाकडून मेट्रो स्थानकातील गळतीचा प्रश्न उपस्थित करण्यात येत असतानाच दुसरीकडे सर्वसामान्य नागरिक, प्रवाशांनी समाजमाध्यमावर मेट्रो स्थानकातील गळतीची छायाचित्रे, चित्रफिती पोस्ट करून ‘मेट्रो ३’च्या कामावर प्रश्न उपस्थित केला आहे. वरळी आणि बीकेसी मेट्रो स्थानकांत होत असलेल्या गळतीविषयी विचारणा केली असता एमएमआरसीने बांधकाम निकृष्ट असल्याचा आरोप फेटाळून लावला. काही ठिकाणी गळतीच्या किरकोळ समस्या उद््भवत असून त्याची कंत्राटदारांकडून तातडीने दुरुस्ती करुन घेण्यात येत आहेत. मेट्रो ३ वाहतूक सेवेत दाखल झाल्यापासूनचा हा पहिलाच पावसाळा आहे. त्यामुळे आवश्यक ती दुरुस्ती करून घेतली जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पण थेंबथेंब पाणी गळणे म्हणजे बांधकाम निकृष्ट आहे वा बांधकामात त्रुटी आहे असे नसल्याचे एमएमआरसीने स्पष्ट केले आहे. तर प्रवाशांच्या ये-जा करण्यासाठीच्या मोकळ्या जागा, एअर वेंटस आणि वातानुकूलीत यंत्रणेच्या डक्टसमधून मुसळधार पावसात पाणी पडू शकते. पण कुठेही २२ किमीच्या मार्गिकेत पाणी साचून सेवा बंद पडत असल्याचे चित्र नाही. मेट्रो ३ ची सेवा व्यवस्थित सुरू आहे. मुंबईकरांना सुरक्षित आणि आरामदायी सेवा पुरविली जात असून यापुढेही पुरवली जाईल, असेही एमएमआरसीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.