मुंबई : अकरावी प्रवेश प्रक्रियेचा भाग १ भरलेला, परंतु भाग २ न भरलेल्या जवळपास ७५ हजार विद्यार्थ्यांना नियमित फेरीमध्ये संधी उपलब्ध व्हावी यासाठी शिक्षण संचालनालयाने दिलेल्या मुदतवाढीमध्ये अवघ्या ९ हजार विद्यार्थ्यांनी भाग २ भरले. त्यामुळे २ दोन भरलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ११ लाख ३८ हजार इतकी झाली आहे.

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला २६ मेपासून सुरुवात झाल्यापासून सतत तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र अर्ज नोंदणी करण्याच्या अखेरच्या दिवशी ५ मेपर्यंत १२ लाख ७१ हजार २९५ विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशासाठी नोंदणी केली. यापैकी १२ लाख १५ हजार १९० विद्यार्थ्यांनी नोंदणी शुल्क ऑनलाईन जमा केले. त्यापैकी १२ लाख ५ हजार १६२ विद्यार्थ्यानी अर्जाचा भाग १ भरला. तर ११ लाख २९ हजार ९२४ विद्यार्थ्यांनी भाग २ भरून अर्ज निश्चित (लॉक) केला आहे. भाग १ भरलेला, परंतु भाग २ भरू न शकलेल्या विद्यार्थ्यांची संख्या जवळपास ७५ हजार इतकी होती. त्यामुळे या विद्यार्थ्यांची नियमित फेरीची संधी वाया जाऊ नये यासाठी शिक्षण संचालनालयाने ६ जून रोजी १२.१५ पासून ७ जून रोजी १२.३० पर्यंत अर्जाचा भाग २ भरण्याची संधी उपलब्ध करून दिली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मात्र या २४ तासांच्या कालावधीमध्ये अवघ्या नऊ हजार विद्यार्थ्यांनीच भाग २ भरला. त्यामुळे भाग २ भरलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ११ लाख ३८ हजार इतकी झाली आहे. अर्ज निश्चित केलेल्या विद्यार्थ्यांचा पहिल्या नियमित फेरीसाठी विचार करण्यात येणार आहे. त्यानुसार अर्ज निश्चित केलेले ११ लाख ३८ हजार विद्यार्थी नियमित फेरीसाठी पात्र ठरणार आहेत.