मुंबई : ‘माणूस म्हणून आपण किती बदललो आहोत आणि किती खालच्या पातळीवर उतरलो आहोत, याचे उदाहरण म्हणजे वैष्णवी हगवणे प्रकरण आहे. आपण राजकारण्यांकडे समाजामध्ये सकारात्मक बदल घडविण्याच्या दृष्टिकोनातून पाहत असतो आणि त्यांच्याच घरात अशी घटना घडते, ही अतिशय भयानक गोष्ट आहे’, असे स्पष्ट मत प्रसिद्ध अभिनेते व कवी किशोर कदम यांनी व्यक्त केले.
हुंड्याच्या छळाला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या पुण्यातील वैष्णवी हगवणेचे प्रकरणाविषयी बोलताना किशोर कदम यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केली. किशोर कदम हे आगामी ‘जारण’ या भयपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहेत. अनिस बाज्मी प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘जारण’ हा मराठी भयपट येत्या ५ जूनपासून संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. करणी व जारण यासारख्या गोष्टींमुळे एका कुटुंबाला सहन कराव्या लागणाऱ्या यातना ‘जारण’ चित्रपटातून मांडण्यात आल्या आहेत.
मानवी भावनांचा आणि दुहेरी आयुष्याचा शोध घेणारा प्रवास या चित्रपटातून मांडण्यात आला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ‘जारण’ चित्रपटाचे दिग्दर्शक हृषिकेश गुप्ते, प्रसिद्ध अभिनेत्री अमृता सुभाष, अभिनेते किशोर कदम आणि अभिनेत्री अनिता दाते यांनी ‘लोकसत्ता’च्या कार्यालयाला नुकत्याच दिलेल्या भेटीत मनमोकळा संवाद साधला. यावेळी गप्पा मारताना भयपटाशी निगडित रहस्यमयी गोष्टीही त्यांनी उलगडल्या. यावेळी विविध मुद्द्यांवर बोलताना वैष्णवी हगवणे प्रकरणाचा उल्लेख निघताच किशोर कदम यांनी सडेतोड मत व्यक्त करत निषेध व्यक्त केला.
‘पुण्यातील वैष्णवी हगवणेचे प्रकरण ही अत्यंत वाईट घटना आहे. अशा घटना आजही आपल्या समाजात घडतात, म्हणजे आपण अजूनही पुढारलेले नाही आहोत’ असे त्यांनी सांगितले. ‘आपण खूप चांगले ब्रँडेड कपडे घालतो, मोठमोठ्या गाड्या चालवतो, पण आपण आपल्या सूनांना अशी वाईट वागणूक देतो, ही अतिशय दयनीय सामाजिक परिस्थिती आहे’ असे सांगत समाजात अशी परिस्थिती कशामुळे उद्भवली आहे, या गोष्टीचा विचार करण्याची वेळ आली असल्याचेही त्यांनी सांगितले. अर्थात या सामाजिक मानसिकतेमागेही अनेक कारणे आहेत, असेही किशोर कदम म्हणाले.