मुंबई : बेस्ट बसची अपुऱ्या सेवा आणि रेल्वेमधील गर्दीतून सुटका मिळविण्यासाठी, उच्च उत्पन्न गटातील नोकरदार वर्गासाठी ॲप आधारित बस सेवा मोठा दिलासा ठरली होती. या बसमधून दररोज सुमारे ४० ते ५० हजार प्रवासी प्रवास करीत होते. परंतु, राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परवानगी न घेताच सुरू असलेली ॲप आधारित बस सेवा बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर उबर शटल सेवा पूर्णपणे बंद झाली. उबर शटल सेवा बंद झाल्याने सार्वजनिक वाहतुकीवर ताण वाढला आहे. तसेच परिवहन मंत्र्यांच्या अनपेक्षित हस्तक्षेपामुळे प्रवासी वर्गामध्ये नाराजी पसरली आहे. ॲप आधारित बस सेवा बंद झाल्यामुळे सोमवारी प्रवाशांना मोठा फटका बसण्याची चिन्हे आहेत.

रेल्वे सेवा उशिराने धावत असल्याने आणि रेल्वेतील गर्दीतून प्रवास करणे गैरसोयीचे असल्याने, तसेच मुंबईत खासगी वाहन चालवणे आणि ते उभे (पार्किंग) करण्याची मोठी समस्या असल्याने ठाणे, पालघर, मुंबई शहर आणि उपनगरातील अनेक जण ॲप आधारित बस सेवेचा वापर करीत होते. सिटी फ्लो, उबर शटल, चलो व इतर ॲप आधारित बस सेवा मुंबई महानगरात सुरू आहे. परंतु, ॲप आधारित वाहनांनी राज्यात व्यवसाय करताना कायदेशीर तत्वांचे पालन करणे आवश्यक आहे.

खासगी वाहतूक व्यवसाय करणाऱ्या बस, मोटारगाडी, बाइक टॅक्सी यांनी नियमांचे उल्लघंन केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश प्रताप सरनाईक यांनी दिले. योग्य परवाने न घेता ॲप आधारित वाहने बेकायदेशीरपणे धावत आहेत. अशा अनधिकृत सेवांवर कारवाई करण्याच्या सूचना सरनाईक यांनी आरटीओच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना केली. त्यानंतर, दोन दिवसांत उबर शटल सेवा बंद झाली. मात्र, सिटी फ्लो आणि चलो ॲप सेवा सुरू असून तीही बंद होण्याची चिन्हे आहेत.

सध्या मुंबई महानगर प्रदेशात उबर शटल, सिटी फ्लो, चलो आणि इतर ॲप आधारित चालकांकडून सुमारे ८०० बस चालवल्या जातात. सुमारे ८०० बसपैकी उबर शटल सेवेच्या सुमारे ५०० बस कार्यरत आहेत. त्यामुळे ॲप आधारित बस सेवेत उबर शटलची महत्त्वाची सेवा आहे. परंतु, परिवहन विभागाने कारवाई करण्यास सुरुवात केल्याने, शुक्रवारपासून ॲप आधारित वाहनांची संख्या कमी होऊ लागली. तर, शनिवारी उबर शटल सेवा पूर्णपणे बंद झाली. सिटी फ्लोच्या काही बस धावत होत्या. मोठ्या संख्येने धावणाऱ्या उबर शटलच्या बस बंद झाल्यामुळे प्रवाशांना फटका बसला. या प्रवाशांना वाहतुकीचे इतर पर्याय शोधण्यासाठी धावपळ करावी लागेल. दरम्यान, उबर ॲपवरून उबर शटल सेवेचा पर्याय बंद करण्यात आला आहे, अशी माहिती उबरच्या प्रवक्त्यांनी दिली.

प्रवाशांचे हाल

गेल्यावर्षीपासून मुंबईत प्रायोगिक तत्त्वावर उबर शटल सेवा सुरू झाली. तसेच २०१७ सालापासून सिटी फ्लोची सेवा सुरू आहे. तर, सिटी फ्लो सेवेला २०२२ सालापासून प्रवाशांचा प्रतिसाद वाढत गेला. परंतु, या बस सेवा बेकायदेशीरपणे सुरू असल्याचे राज्य परिवहन विभागाच्या निदर्शनास आले. अखेर शनिवारपासून, उबर शटल वाहतूक कंपनीची प्रीमियम बस सेवा बंद करण्यात आली. उबर शटल बसगाड्या बंद झाल्यामुळे कल्याण, डोंबिवली, ठाणे, पनवेल, भाईंदर येथून वांद्रे-कुर्ला संकुल, वरळी, दक्षिण मुंबई आणि मुंबई पूर्व, पश्चिम उपनगरात जाणाऱ्या नोकरदारांचे हाल झाले. ही सेवा बंद झाल्याने सोमवारी प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे.

वाहतूक सेवेचा भार कमी करण्यासाठी ॲप आधारित बस सेवा महत्त्वाची आहे. परंतु, अचानक ही सेवा बंद केल्याने, प्रवाशांचे हाल होण्याची चिन्हे आहेत. उबर शटल, सिटी फ्लो बस सेवेमुळे कर्मचाऱ्यांना दिलासा मिळत होता. प्रताप सरनाईक यांनी अचानक ही सेवा बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे प्रवाशांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

सरकारच्या हेतूविषयी संशय

मुंबई महानगरातील रेल्वे आणि बेस्ट सेवेवरील वाहतुकीचा भार कमी करण्याच्या दृष्टीने ॲप आधारित बस सेवा उपयोगी पडत होती. उलवे भागातून सुमारे ४० बस वांद्रे – कुर्ला संकुल, मालाड, बोरिवली, नरिमन पॉंइंट या भागात येतात. यातून सुमारे ६ हजार प्रवासी प्रवास करीत होते. परंतु, राज्य सरकारने अचानक ॲप आधारित बस सेवावर कारवाईचा निर्णय घेतल्याने सरकाच्या हेतूविषयी शंका निर्माण झाली आहे. राज्य सरकारने प्रवाशांचा विचार करून सकारात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे. हर्ष कोटक, सरचिटणीस, बस मालक संघटना

राज्य सरकारने अचानक घेतलेल्या निर्णयामुळे प्रवासी, बस चालक आणि बस मालक यांचे मोठे नुकसान होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून बस तशाच उभ्या असल्याने व्यवसाय ठप्प होण्याची भीती आहे. – सुरेश गाला, बस मालक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बेस्ट बसची अपुऱ्या सेवा आणि रेल्वेत होणारी गर्दी यापासून मुक्तता मिळवण्यासाठी ॲग्रीगेटर बस उत्तम पर्याय होतो. परंतु, या बसगाड्यांवर शुक्रवारपासून कारवाईला सुरुवात करण्यात आली. परिणामी, बस सेवा बंद झाल्याने चालकांचा रोजगार बुडाला आहे. – विनय सिंग, बस मालक