मुंबई: उष्ण आणि धुरकट हवामानानंतर आलेल्या अचानक पावसामुळे मुंबईतील हवेच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा झाली असून समीर ॲपवर शनिवारी मुंबईच्या हवा गुणवत्तेची श्रेणी ‘चांगली’ नोंदली गेली.

शनिवारी मुंबईचा एकूण हवा निर्देशांक ५६ इतका म्हणजेच चांगल्या श्रेणीत नोंदला गेला. मागील काही दिवसांपासून मुंबईची हवा गुणवत्ता प्रामुख्याने ‘मध्यम’ श्रेणीत नोंदली जात होती. दरम्यान, मागील तीन दिवसांपासून मुंबईत पडलेल्या पावसामुळे हवेतील प्रदूषण कमी झाले, धूळ आणि सूक्ष्म कण खाली बसले, आणि हवेतील ओलसरपणा वाढल्याने अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे.

हवेची गुणवत्ता सुधारल्याने श्वसनविकार असलेल्या रुग्णांना दिलासा मिळाला आहे. तरी नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. समीर ॲपच्या नोंदीनुसार शनिवारी भायखळा येथील हवा निर्देशांक ३७, माझगाव ५८, कुलाबा ६१, शिवडी ४३, मुलुंड १४, बोरिवली ३६, चेंबूर ३८, घाटकोपर ३०, कांदिवली ३३, अंधेरी ६२ आणि वांद्रे येथे ६३ इतका होता.

गोवंडी शिवाजी नगरमधील हवा ‘मध्यम’

गोवंडीमधील शिवाजी नगर परिसरातील हवा सातत्याने खालावली असते. मुंबईत इतर भागातील हवा गुणवत्ता ‘चांगली’ असतानाही शिवाजी नगर येथील हवा गुणवत्ता मात्र शनिवारी ‘मध्यम’ श्रेणीत नोंदली गेली. तेथील हवा गुणवत्ता निर्देशांक १११ इतका होता. काही महिन्यांपूर्वी मुंबईची हवा गुणवत्ता खालावली होती तेव्हा सार्वाधिक ‘वाईट’ हवेची नोंद शिवाजी नगरमध्ये झाली होती. त्यानंतरही पालिकेने, तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या उपाययोजनेनंतर येथील हवेत फारसा फरक पडला नव्हता.

पुढील काही दिवस अशीच स्थिती ?

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन-तीन दिवस मुंबईत काही भागात ढगाळ, तर काही ठिकाणी कोरडे वातावरण असेल. हवा गुणवत्तेतील ही सुधारणा काही ठराविक कालावधीसाठी कायम राहू शकते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तज्ज्ञांचे म्हणणे काय ?

पावसामुळे हवा गुणवत्तेत झालेली सुधारणा ही दीर्घकाळ राहणार नाही, असे मत पर्यावरणतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. सार्वजनिक वाहतुकीचा वापर, वाहनांची योग्य देखभाल, झाडांची लागवड आणि औद्योगिक प्रदूषणावर नियंत्रण हे शाश्वत उपाय महत्त्वाचे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.