मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी कक्ष) विधि तीन वर्ष अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर केला. या परीक्षेत राज्यातील पाच विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल गुण मिळाले. तर परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना ‘नॉन झिरो स्कोअर’ म्हणजेच किमान गुण मिळाले आहेत.
राज्यभरातून या परीक्षेसाठी ७४ हजार ६२१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. ही उपस्थिती ७८.९६ टक्के होती. सीईटी कक्षाने २ व ३ मे रोजी घेतलेल्या विधि तीन वर्ष सीईटीचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत गणेश चौधर, सोमनाथ सुधांशू, श्रीहरी प्रभू, स्वप्निल सिंग, तन्मय चिंडालिया या पाच विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल गुण मिळाले. या परीक्षेला बससलेल्या सर्वच ७४ हजार ६२१ उमेदवारांना ‘नॉन-झिरो स्कोअर’ मिळाला आहेत. विधि तीन वर्ष अभ्यासक्रमाच्या सीईटीसाठी ९४ हजार ५०६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
या विद्यार्थ्यांची दोन टप्प्यात परीक्षा घेण्यात आली. पहिल्या टप्प्यात म्हणजे २ मे रोजी तीन सत्रांमध्ये नोंदणी केलेल्यांपैकी ५७ हजार २९५ विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र पाठविण्यात आले होते. मात्र तिन्ही सत्रामध्ये मिळून २ मे रोजी ४५ हजार ३१५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यामध्ये सकाळच्या सत्रात १४ हजार ६८०, दुपारच्या सत्रात १५ हजार २६९ आणि तिसऱ्या सत्रात १५ हजार ३६६ विद्यार्थी उपस्थित होते. त्याचप्रमाणे दुसऱ्या टप्प्यात म्हणजे ३ मे रोजी दोन सत्रात ३७ हजार २११ विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी प्रवेशपत्र पाठविण्यात आले होते. त्यापैकी २९ हजार ३०६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
यामध्ये सकाळच्या सत्रात १८ हजार ६९५ विद्यार्थ्यांपैकी १४ हजार ५५२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर दुपारच्या सत्रात नोंदणी केलेल्या १८ हजार ५१७ विद्यार्थ्यांपैकी १४ हजार ७५४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. दोन दिवस झालेल्या परीक्षेमध्ये ७४ हजार ६२१ विद्यार्थी उपस्थित होते. यामध्ये मुलांची संख्या ४९ हजार ४०६, मुलींची संख्या २५ हजार २१३ आणि अन्य २ विद्यार्थ्यांचा समावेश होता. निकालानंतर आता प्रवेश प्रक्रिया लवकर सुरू होईल, असे सीईटी कक्षाने स्पष्ट केले.